Hot Posts

6/recent/ticker-posts

कुरुल गटाची निवडणूक ठरली जिल्ह्यातील सर्वाधिक चुरशीची लढत पराभवातून आत्मपरीक्षण व नव्या वाटचालीचा निर्धार – आ. राजू खरे

 कुरुल गटाची निवडणूक ठरली जिल्ह्यातील सर्वाधिक चुरशीची लढत

पराभवातून आत्मपरीक्षण व नव्या वाटचालीचा निर्धार – आ. राजू खरे

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक हाय व्होल्टेज आणि चुरशीची लढत म्हणून कुरुल जिल्हा परिषद गटाची निवडणूक ओळखली जात आहे. मतमोजणीपासून निकालापर्यंत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. अत्यंत अटीतटीच्या लढतीत उमेश पाटील यांचा निसटता पराभव झाला.

या निकालानंतर आमदार राजू खरे यांनी उमेश पाटील यांची भेट घेत पराभवामागील कारणांचा सखोल आढावा घेतला. यावेळी निवडणूक प्रचार, मतदारांचा कल, संघटनात्मक बाबी तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर सविस्तर मंथन करून पुढील वाटचालीबाबत विचारविनिमय करण्यात आला. यावेळी बोलताना आ. राजू खरे म्हणाले की, “पराभव हा शेवट नसून तो आत्मपरीक्षणाची आणि पुढील संघर्षाची नवी सुरुवात असते.”

चर्चेदरम्यान जनतेसाठी सुरू असलेली सेवा, सामाजिक कार्य आणि विकासाची बांधिलकी कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, तर ती अधिक जोमाने आणि सातत्याने सुरू राहील, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. निवडणूक निकालांमुळे लोकांशी असलेले नाते किंवा जनसेवेची जाणीव कमी होत नाही, उलट ती अधिक जबाबदारीने पार पाडली पाहिजे, असेही मत व्यक्त करण्यात आले.

लोकशाही प्रक्रियेत हार-जीत या स्वाभाविक बाबी आहेत. मात्र, जनतेचा विश्वास, निष्ठा आणि सेवाभाव हेच खरे यशाचे मोजमाप असल्याचे आ. राजू खरे यांनी स्पष्ट केले. कुरुल गटातील ही लढत लोकशाही मूल्ये आणि राजकीय परिपक्वतेचे प्रतीक ठरली असून, या निकालातून पुढील काळात अधिक सक्षम आणि संघटित पद्धतीने काम करण्याचा संदेश देण्यात आला आहे.

कुरुल गटाच्या निवडणुकीतून निर्माण झालेली ही सकारात्मक भूमिका आणि आत्मपरीक्षणाची प्रक्रिया सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जात असून, येत्या काळात त्याचे पडसाद राजकीय व सामाजिक क्षेत्रात उमटतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments