‘माझा शिवबा’ लेखन स्पर्धेचे आयोजन
चंद्रनील सोशल फाउंडेशनचा समाजप्रबोधनात्मक उपक्रम;
सी. ए. सुशील बंदपट्टे यांच्या संकल्पनेतून
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :– छत्रपती शिवाजी महाराज यांना केवळ डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घ्यावे, त्यांच्या विचारांतून आणि कार्यातून नव्या पिढीला घडवावे, या मूलभूत उद्देशाने चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘माझा शिवबा’ या भव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि युवक-युवतींमध्ये शिवरायांचे विचार रुजावेत, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असून, ही संकल्पना सी. ए. सुशील बंदपट्टे यांची आहे.
“एकच ध्यास… समाजाचा विकास!” या ब्रीदवाक्याअंतर्गत ही लेखन स्पर्धा प्रत्येक परिवारासाठी आणि परिवारातील प्रत्येक घटकासाठी खुली ठेवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाचून नव्हे, तर वाचून आणि विचार करून साजरी व्हावी, असा स्पष्ट संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
या स्पर्धेसाठी पहिला गट – इयत्ता ५ वी, ६ वी व ७ वी, दुसरा गट – इयत्ता ८ वी, ९ वी व १० वी, खुला गट – १० वी पुढील सर्व वयोगटांसाठी खुला असे तीन गट निश्चित करण्यात आले आहेत.
स्पर्धकांसाठी 1. शिवाजी महाराजांचे बालपण, 2. स्त्री सन्मान व शिवराय, 3. शिवाजी महाराज आता असते तर… हे तीन विषय देण्यात आले आहेत.
गटनिहाय शब्दमर्यादा निश्चित करण्यात आली असून, पहिल्या गटासाठी ३०० ते ४०० शब्द, दुसऱ्या गटासाठी ४०० ते ६०० शब्द, तर खुल्या गटासाठी ७०० ते १००० शब्द इतकी शब्दमर्यादा ठेवण्यात आली आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व आकर्षक रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. पहिल्या व दुसऱ्या गटासाठी प्रथम येणाऱ्या १० क्रमांकांना प्रत्येकी ₹२५००, द्वितीय २० क्रमांकांना ₹१५००, तर तृतीय ३० क्रमांकांना ₹१००० रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
खुल्या गटासाठी प्रथम क्रमांकास ₹११,०००, द्वितीय ₹७,००० व तृतीय ₹५,००० अशी रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
स्पर्धेत सहभाग पूर्णतः मोफत असून, लेख मराठी भाषेतच सादर करणे बंधनकारक आहे. लेख जमा करण्याची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२६ अशी आहे. स्पर्धेचा निकाल संबंधित स्पर्धकांना वैयक्तिकरित्या कळविण्यात येणार असून, आयोजकांचा निर्णय अंतिम राहील.
या स्पर्धेसाठी पार्क चौक येथील गॅलक्सी स्पोर्ट्स, बाळीवेस येथील चंद्रनील सोशल फाउंडेशन कार्यालय, तसेच जुळे सोलापूर येथील सह्याद्री फूड्स अँड मिनरल वॉटर केंद्र या ठिकाणी लेख जमा करण्यात येणार आहेत.
या उपक्रमासाठी सी. ए. सुशील बंदपट्टे, विकास गोसावी, आसावरी गांधी व भोमीशा शहा यांचे मार्गदर्शन लाभत असून, अधिक माहितीसाठी चंद्रनील सोशल फाउंडेशन (मो. ९०२८०६३०३०), विकास गोसावी (मो. ९८२२६६०१२१), आसावरी गांधी (मो. ९९६०१०५०५१) आणि भोमीशा शहा (मो. ८७७९०८५८८६) या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, मूल्ये, स्त्री सन्मानाची भूमिका आणि लोककल्याणाची दृष्टी नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारी ही लेखन स्पर्धा समाजप्रबोधनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.


0 Comments