Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापुर जिल्ह्यात १६ फेब्रुवारीपासून होणार 'व्याघ्र गणना'

 सोलापुर जिल्ह्यात १६ फेब्रुवारीपासून होणार 'व्याघ्र गणना'




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देशभर सध्या 'अखिल भारतीय व्याघ्र गणना' सुरू असून, सोलापूर जिल्हाही या मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. १९ ते २४ जानेवारी दरम्यान वाघांच्या पदचिन्हांची शोधमोहीम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर, आता दुसऱ्या टप्प्यात १६ फेब्रुवारीपासून 'इन कॅमेरे' मोजणी केली जाणार आहे.
या प्रक्रियेसाठी जिल्ह्यात एकूण ४५ ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले जाणार असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक अजित शिंदे यांनी दिली.गेल्या दीड वर्षांपासून सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पट्टेरी वाघाचा वावर सातत्याने दिसून येत आहे.
धाराशिवमधील येडशी अभयारण्य क्षेत्रात असलेला हा वाघ बार्शी तालुक्यातील वैराग परिसरापर्यंत पोहोचला होता. या वाघाने वैराग आणि माढा तालुक्यातील धानोरे परिसरात हल्ले केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर बार्शीसह मोहोळ, माढा आणि उत्तर सोलापूर या तालुक्यांतील हालचालींवर वनविभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. केवळ पट्टेरी वाघच नव्हे, तर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत बिबट्यांचा वावरदेखील मोठ्या प्रमाणात आढळला आहे. त्याचे निरीक्षण यातून होणार आहे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि पट्टेरी वाघाच्या भटकंतीमुळे सोलापूर जिल्ह्यातील ही व्याघ्र गणना वनविभागासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
...अशी होणार मोजणी
वनविभागाच्या या मोहिमेचा पहिला टप्पा (१९ ते २४ जानेवारी) पूर्ण झाला असून, यामध्ये वनाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जंगलात जाऊन पावलांच्या ठशांचे निरीक्षण केले आहे. आता १६ फेब्रुवारीपासून तंत्रज्ञानाचा वापर करून 'ट्रॅप कॅमेऱ्याच्या' माध्यमातून वन्यजीवांची अधिकृत नोंद केली जाईल, हे कॅमेरे अशा ठिकाणी लावले जातील जिथे वन्यप्राण्यांचा वावर किंवा पाण्याचे स्रोत अधिक आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments