राज्यात ६० हून अधिक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड; मतदारांना फटका
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला असला, तरी अनेक ठिकाणी निवडणूक यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका मतदारांना बसला.
राज्यभरात ६० हून अधिक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्याने निवडणूक प्रशासनाच्या सज्जतेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. निवडणूक प्रक्रियेत सर्वाधिक अडथळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात पाहायला मिळाले.
तालुक्यातील सुमारे ४० ते ४५ केंद्रांवर मतदान यंत्रे अचानक बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा झाला. खेर्डी जिल्हा परिषद गटातील पाच केंद्रांवर यंत्रे निकामी झाल्याने मतदारांना रांगेतच उभे राहावे लागले. शिरगाव येथे सकाळी दोन यंत्रे तासभर बंद होती, तर सावर्डे कॉलनीमध्ये सकाळी ९ वाजताच यंत्रात बिघाड झाला.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र- रायगड जिल्ह्यातील अलिबाग (सहाण केंद्र) येथे मतदान सुरू होण्यापूर्वीच यंत्रात बिघाड झाला. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर आणि सातारा जिल्ह्यातील कराडमधील चचेगाव येथेही सुरुवातीच्या काळात मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली होती.
सांगलीतील चिकुर्डे गटातही देवर्डे केंद्रावर काही काळ मतदान थांबले होते. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज येथील मतदान केंद्रावर दोन यंत्रे बदलावी लागली. धाराशीव- तुळजापूर तालुक्यातील शिंदफळ गटातील शिरढोण येथे यंत्रातील बिघाडामुळे मतदानाला विलंब झाला.
0 Comments