Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपकडून डावलल्याचा आरोप; मारवाडी समाज संतप्त

 भाजपकडून डावलल्याचा आरोप; मारवाडी समाज संतप्त


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-भाजपकडून मारवाडी समाजाला पुन्हा एकदा उमेदवारी न दिल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी समाजाची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती शहर भाजपचे उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राजस्थानी (मारवाडी) समाज हा सुरुवातीपासून राष्ट्रवादी विचारसरणीचा व हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजपसोबत ठामपणे उभा राहिलेला आहे. राज्य व केंद्रात भाजपची सत्ता असतानाही यंदाच्या महापालिका निवडणुकीत मारवाडी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी आग्रही मागणी सकल मारवाडी समाजातर्फे करण्यात आली होती. यासंदर्भात आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यासह इतर मान्यवरांना निवेदन देण्यात आले होते.

मागील वीस वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत समाजाला केवळ आश्वासने दिली गेली. मागील निवडणुकीत पुढील वेळी समाजाला न्याय दिला जाईल, असे वचन देण्यात आले होते. मात्र यंदाही समाजाला डावलण्यात आल्याने सकल राजस्थानी समाजात तीव्र असंतोष पसरला आहे.

भाजपच्या वाढीसाठी सोलापूर शहरात स्व. गोवर्धनदास भुतडा, स्व. गोपीकिसन भुतडा, स्व. मथुरादास डागा, स्व. श्यामसुंदर तिवाडी, विजय बजाज, बाळमुकुंद झंवर यांसारख्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले असल्याचे दायमा यांनी सांगितले.

यंदाच्या निवडणुकीसाठी सकल मारवाडी समाज व पक्ष कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक झाली होती. पक्षाच्या शब्दावर विश्वास ठेवून समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक १, ३, ४ व ५ मधून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरले होते. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुक उमेदवारांना झुलवत ठेवून तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांचा तीव्र भ्रमनिरास झाला, असा आरोपही दायमा यांनी केला.या पत्रकार परिषदेला लक्ष्मीकांत दरग, सविता जोशी, रजनी शर्मा यांच्यासह समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Reactions

Post a Comment

0 Comments