महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
.jpg)
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- दरवर्षीप्रमाणे यावर्षी महात्मा फुले विद्यालयाचा एसएससी म्हणजेच दहावीचा निकाल रेकॉर्ड ब्रेक लागलेला आहे. मार्च 2022 मध्ये झालेल्या दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. कोरोना मुळे मागील दोन वर्ष सत्कार समारंभाचा कार्यक्रम झालेला नव्हता. त्यामुळे या कार्यक्रमांमध्ये मार्च 2020 मार्च 2021 आणि मार्च 2022 अशा तीनही वर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थी सोहम उंबरे या विद्यार्थ्याला दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तसेच चालू वर्षी सर्वप्रथम आल्याबद्दल किशोर भानवसे व सारंग कुटे या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 35 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच इतर अनेक विद्यार्थ्यांना जवळपास साडेतीन लाख रुपयांची बक्षिसे वाटण्यात आली. आर्चरी या खेळामध्ये राष्ट्रीय स्पर्धेत विजेत्या झालेल्या विद्यार्थिनी गाथा खडके व रेशमा लोकरे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. उत्कृष्ट निकाल लावल्याबद्दल शिक्षकांना देखील बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे उपस्थित होते. विद्यालयातील विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण घेऊन राज्यात सर्वप्रथम येत असल्याबाबत आमदार बबनरावजी शिंदे यांनी कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या, तसेच विद्यालयाच्या भविष्यातील अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश व उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील नागराज शिंदे साहेब यांनी भूषवले. स्पर्धेच्या युगामध्ये एकमेका साह्य करू अशा पद्धतीचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवावेत असे मत अध्यक्षांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण भानवसे सर यांनी केले. दरवर्षी विद्यालयाचा निकाल हा 100% लागत असतो, यावर्षीही शंभर टक्के निकालाची परंपरा विद्यालयाने कायम राखलेली आहे, तसेच येणाऱ्या काळातही आपल्या शाळेचा निकाल हा उत्कृष्टच असेल असे मत नारायण भानवसे सर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये मांडले. यावेळी टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब नाना देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष संजय कुटे, शांतीलाल अण्णा बागवाले, ग्रामपंचायत सदस्य वैभव बापू कुटे, विठ्ठल कोळपे, सोमनाथ साळुंखे, शैलेश ओहोळ, गोरख बाप्पा देशमुख, जयवंत पोळ, नागेश खटके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थी व पालक भरपूर संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक विजय यादव सर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उच्च प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शोएब बागवान सर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment