ग्रंथपालन वर्गाच्या विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची भेट
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचे भांडार नसून ज्ञान, संस्कार आणि समाजप्रबोधनाचे प्रभावी केंद्र आहे. विद्यार्थ्यांपर्यंत मौल्यवान ज्ञान पोहोचविण्याचे मोठे समाधान लाभत असल्याचे प्रतिपादन प्रा. अविनाश गायकवाड यांनी केले.
येथील जिल्हा ग्रंथालय संघात आयोजित ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा वर्ग २०२६ (सोलापूर केंद्र) च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी प्रा. गणेश फंड, प्रा. जाफर बांगी, प्रा. दत्ता मोरे तसेच वर्ग व्यवस्थापक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी ग्रंथपालन क्षेत्रातील बदलते स्वरूप, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर, डिजिटल ग्रंथालयांची गरज आणि ग्रंथपालांची बदलती भूमिका याविषयी सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांच्या वतीने प्रथमेश बनसोडे, वेदिका चव्हाण, संध्याराणी मोरे, सुजाता हुळी आणि अंबिका सुलाखे यांनी मनोगत व्यक्त करत वर्गातील अनुभव आणि भावी वाटचालीबाबत विचार मांडले.
समाजाप्रती आपली बांधिलकी जपत ग्रंथपालन वर्गातील विद्यार्थ्यांनी जिल्हा ग्रंथालय संघाला स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके भेट दिली. या उपक्रमातून सामाजिक जाणीव आणि वाचन संस्कृतीविषयीची आपली बांधिलकी त्यांनी अधोरेखित केली. विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतांजली गंभीरे यांनी केले.
No comments:
Post a Comment