आ. समाधान आवताडे यांचे तातडीच्या पंचनाम्याचे निर्देश
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील द्राक्षबागा, इतर फळबागा तसेच बेदाणा शेडचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, वीज पडून गाय व शेळी दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार समाधान आवताडे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची सविस्तर माहिती घेतली तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
या दौऱ्यात प्रांताधिकारी माळी, तहसीलदार मदन जाधव, तालुका कृषी अधिकारी मिसाळ मॅडम, तालुका पंचायत समिती सभापती दिपाली ताड, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, उपनगराध्यक्ष भगत, पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब निकम तसेच गावातील पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासनाला तत्काळ नुकसानग्रस्त द्राक्षबागा, फळबागा, बेदाणा शेड तसेच धोंडीराम गरंडे या शेतकऱ्याच्या जर्सी गाईच्या मृत्यूबाबत पंचनामे करून त्वरित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच शेतकऱ्यांना आजच्या आज शासनाकडून तातडीची मदत मिळावी यासाठी महसूल व पशुसंवर्धन विभागाने त्वरीत कार्यवाही करावी, असे स्पष्ट सांगितले.
अशा संकटाच्या काळात शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हीच आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले असून, शासन स्तरावर आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
.png)
No comments:
Post a Comment