भारत मुक्ती मोर्चातर्फे रविवारी नागपुरात मोर्चा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि. २६ ते ३० डिसेंबरदरम्यान ४५ वे बामसेफ व १५ वे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन ओडिशा राज्यातील कटक येथे वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. मात्र अचानक कटक प्रशासनाने स्थानिक आर.एस.एस. व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या दबावामुळे अधिवेशनाच्या सर्व परवानग्या रद्द केल्या. परिणामी अधिवेशन होऊ शकले नाही. ही कृती भारतीय संविधानाने प्रदान केलेल्या मूलभूत अधिकारांचे उघड उल्लंघन करणारी आहे. या निषेधार्थ भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी चार टप्प्यात आंदोलनाची घोषणा केलेली आहे. या चौथ्या टप्प्याअंतर्गत दि. २२ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे संघ मुख्यालयावर विशाल महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
या महामोर्चाचे नेतृत्व वामन मेश्राम तसेच राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे अध्यक्ष चौधरी विकास पटेल हे करणार आहेत.ही महारॅली संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. ओडिशा राज्यातील कटक येथे रद्द करण्यात आलेल्या अधिवेशनास पुन्हा परवानगी द्यावी, ओबीसीसह सर्व जातीची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, भारतातील सर्व निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांना संपूर्ण संरक्षण मिळावे. अधिवेशनाच्या तयारीसाठी संघटना, प्रतिनिधी व कार्यकर्त्यांना झालेल्या खर्चाची भरपाई करण्यात यावी. मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या ओडिशा राज्य सरकारला बरखास्त करण्यात यावे, अशा या विविध मागण्या आहेत.
या पत्रकार परिषदेला मधुकर राजगुरू, सैफन शेख, योगिता वाघमारे, योगेश शिदगणे, रमेश पाटोळे आदी उपस्थित होते.
.png)
0 Comments