सेन्सॉर बोर्ड विरोधी आंदोलनाचा दणका पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कवितेसह... चल हल्ला बोल सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिले।
मुंबई (कटूसत्य वृत्त):- अरविंद बनसोडे कुरनूरकर आज दिनांक ६।८।२०२५ रोजी ,मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी लोकांचा सिनेमा चळवळ निर्माता, दिग्दर्शक महेश बनसोडे, लोकांचा सिनेमा चळवळी चे संजय शिंदे आणि सेन्सॉर बोर्ड विरोधी आंदोलनाचे रवि भिलाणे ,फिरोज मुल्ला तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होते. महेश बनसोडे यांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधताना,कोण नामदेव ढसाळ असा उर्मट आणि मूर्खपणाचा सवाल करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाला जन आंदोलनाच्या प्रचंड रेट्यामुळे अखेर नमतं घेत, चल हल्ला बोल या सिनेमाला नामदेव ढसाळ यांच्या कवितेसह प्रमाणपत्र द्यावं लागलं आहे. लोकांचा सिनेमा चळवळीच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत या बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.लोकांचा सिनेमा चळवळीच्या माध्यमातून, लोकवर्गणीतून निर्माण झालेल्या चल हल्ला बोल या सिनेमाला सेन्सॉर बोडनि प्रमाणपत्र नाकारल्यानंतर मोठा वाद उफाळून आला होता. बहुजनांची अभिव्यक्ती आणि संविधानिक अधिकार डावलणाऱ्या सेन्सॉर बोर्ड विरोधात दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता महेश बनसोडे, लोकांचे दोस्त रवी भिलाणे, संजय शिंदे, ज्योती बडेकर, बाळासाहेब उमप, अभिनेत्री प्रतिभा शर्मा, कॉ. सुबोध मोरे, कष्टकरी शेतकऱ्यांचे नेते विठ्ठल लाड, संभाजी ब्रिगेडचे प्रमोद शिंदे, पँथर सुमेध जाधव, डॉ. स्वप्निल ढसाळ, डॉ. संगीता ढसाळ, मयूर शिर्के, संतोष अभंगे, फिरोज मुल्ला, राजाभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सेन्सॉर बोर्ड विरोधी आंदोलन उभे राहिले. हे आंदोलन महाराष्ट्रभर पोहचले. "कोण नामदेव ढसाळ?" असा प्रश्न विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाला, तुमचा बाप नामदेव ढसाळ असा रोखठोक जवाब दिला गेला. विधानसभेत हा विषय गाजला. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस, डावे, समाजवादी, रिपब्लिकन, वंचित बहुजन आघाडी, बसपा, बामसेफ अशा विविध पक्ष आणि जन संघटनांनी सेन्सॉर बोर्ड विरोधात तीव्र भूमिका घेतल्या. जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांनी सेन्सॉर बोर्ड मुंबई ऑफिसला जाऊन दणका दिला. सांगली जिल्हा कडेगाव तालुक्यातून परशुराम माळी यांच्या नेतृत्वाखाली उग्र मोर्चा निघाला. मुंबई मराठी पत्रकार संघाचे संदीप चव्हाण, दिवाकर शेजवळ आदी ज्येष्ठ पत्रकार आणि त्यांचे पत्रकार सहकारी तसेच शोध पत्रकार निरंजन टकले आदींनी सक्रिय पाठिंबा दिला आणि सेन्सॉर बोर्ड नमते झाले.पुनरावलोकन कमिटीचे प्रमुख प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक टी. एस नागा भरण्णा, तसेंच सेन्सॉर बोर्डाचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र सिंग यांनी आंदोलनाची भूमिका समजून घेत थेट भूमिका घेतली. आणि काही मामुली फेरफार केल्यानंतर चल हल्ला बोल सिनेमाला ए प्रमाणपत्र दिले गेले. मात्र त्यातील नामदेव ढसाळ यांची कविता कायम ठेवण्यात आली हे सर्वाधिक महत्वाचं ठरलं.भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा विजय आहे. या प्रसंगी त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे जाहीर आभार मानले. तसेच संजय शिंदे यांनी लोकांचा सिनेमा चळवळीच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्यासाठी नवनवे प्रयोग राबवणार असल्याची माहिती दिली. लवकरच हा सिनेमा रिलीज होणार आहे. तो समाजापर्यंत लवकरच पोहचणार आहे.सेन्सॉर बोर्ड विरोधी आंदोलनाचे नेते रवि भिलाणे म्हणाले की, चल हल्ला बोल या सिनेमाला सेन्सॉर ची मान्यता मिळणे ही तर एक औपचारिकता आहे. मात्र आमची लढाई ही देशातून सेन्सॉर बोर्ड हटवणे यासाठी आहे आणि ती लढाई सेन्सॉर बोर्ड बरखास्त होईपर्यंत चालूच राहील. गणपती उत्सव संपल्यावर नंतरच चल हल्ला बोल या सिनेमाला प्रदर्शन दाखवण्यात येईल जर या चल हल्ला बोल या सिनेमाला पुन्हा बंदी आणली तर आंदोलन करण्याची भुमिका घेणार आहे.असे महेश बनसोडे यांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधला.
0 Comments