Hot Posts

6/recent/ticker-posts

आषाढीवेळी पंढरपुरात पूर येणार नाही! उजनीतून ४ टीएमसी पाणी सोडले

 आषाढीवेळी पंढरपुरात पूर येणार नाही! उजनीतून ४ टीएमसी पाणी सोडले
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी वारीवरील संभाव्य पूर संकट टाळण्यासाठी अवघ्या पाच दिवसांत उजनीतून चार टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. ४ ते ८ जुलै या काळात चंद्रभागेत अवघा पाच हजार क्युसेकचा विसर्ग राहील, असे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.
मुसळधार पाऊस झाला तरी उजनीत तीन-चार दिवस तो पूर्ण विसर्ग साठवून ठेवता येईल, यासाठी धरणातील पाणीसाठा ७७ टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत आणला आहे.
श्री पांडुरंगाच्या आषाढी सोहळ्यासाठी अंदाजे १३ ते १५ लाख भाविक ६ जुलै रोजी पंढरपूरमध्ये असतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. पण चंद्रभागेच्या वाळवंटात पाण्याचा मोठा विसर्ग राहिल्यास त्याठिकाणी थांबणाऱ्या दोन ते तीन लाख वारकऱ्यांची पर्यायी सोय कोठे करता येईल, यावर प्रशासनाचे विचारमंथन सुरू आहे. मात्र, १५ ते २० हजार क्युसेकचा विसर्ग राहिला तरी चंद्रभागेच्या वाळवंटात पाणी राहते. त्यामुळे वारी काळात उजनीतून सोडला जाणारा विसर्ग पाच हजारांपर्यंतच असावा, यादृष्टीने सध्या भीमा नदीतून सध्या मोठा विसर्ग सोडून दिला जात आहे.
दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाचेही तगडे नियोजन झाले असून चंद्रभागेच्या वाळवंट परिसरात किती प्रमाणात मोठा विसर्ग असल्यास वारकऱ्यांना नदीत कुठपर्यंत येता येईल, याचेही नियोजन सुरू आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी बचाव पथके, अत्याधुनिक बोटी देखील त्याठिकाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहेत.
वारी काळात वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाय
आषाढीवेळी वाळवंटात किती पाणी राहील, ही माहिती जलसंपदा विभागाकडे आहे. पण, वारी काळात एकूण १० बोटी नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षेसाठी असतील. कोल्हापूर, पुणे, सोलापूर येथील बचाव पथके असतील. राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे एक पथक राहील. २१ जूनपासून आतापर्यंत आमच्या टीमने १२ जणांचे जीव वाचविले आहेत. वारी काळात सुक्ष्म नियोजन असणार आहे.
- शक्तीसागर ढोले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सोलापूर
पाच दिवसांत सोडले चार टीएमसी पाणी
उजनी धरण रविवारी (ता. २२) ७७ टक्के भरले होते. त्यावेळी धरणात १०५ टीएमसी पाणी होते. आषाढी वारीच्या वेळी चंद्रभागेच्या वाळवंटात कमीत कमी कमी पाणी राहील, यासाठी उजनीतून पाच दिवसात चार टीएमसी सोडण्यात आले आहे. सध्या उजनीतून २१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग भीमा नदीतून सोडला जात आहे. धरणात सध्या दौंडवरून १३ हजार आणि स्थानिक पावसाचा विसर्ग १० हजार क्युसेकचा जमा होत आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments