Hot Posts

6/recent/ticker-posts

महापुरुषांचे विचारच समाजाला तारतात-विशाल गरड

 महापुरुषांचे विचारच समाजाला तारतात-विशाल गरड




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- समाज सुसंस्कारित होण्यासाठी महापुरुषांचे विचार आचरणात आणणे काळाची गरज आहे.पालकांनी पाल्यांना मोबाईल देण्याऐवजी महापुरुषांचे इतिहास व विचार समजावून सांगावे. महापुरुषांचे विचारच समाजाला तारतात असे 
बार्शीचे विशाल गरड यांनी प्रतिपादन केले.

नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमालेप्रसंगी गरड बोलत होते.'नाते, संस्कार आणि समाज' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
गरड पुढे म्हणाले,पूर्वी नावात सुद्धा संस्कार होते, आज दुर्दैवाने आपण काहीही संबंध नसताना नाव ठेवतो.शिवाजी, संभाजी, मल्हार,अहिल्या,तुळजाई,
ज्योतीबा,विठ्ठल,पांडुरंग हे संस्काराचे नाव आज आपण विसरुन जात आहोत. विविधतेतून एकता हा संस्कार समाजातूनच मिळत असतो. त्रिकालाबाधित माता ही जगात सर्व श्रेष्ठ आहे. संस्कारात्मक जीवन जगणे ही काळाची गरज आहे. समाज एकमेकांच्या सहकार्यातून व संस्कारातून घडत असते.सध्या घरात व समाजात संस्कारांची गरज आहे.मोबाईल रक्षक नसून भक्षक आहे . विज्ञानाला अध्यात्माची जोड द्यावीच लागते.आपले जीवन समृद्ध करण्यासाठी वाचन संस्कारही  काळाची गरज आहे. म्हणून आजच्या तरुणांनी वाचनाचे वेड लावून घेण्याचे आवाहन केले. पाश्चिमात्य संस्कृतीचा वाईट परिणाम तरुणांवर होत आहे.तरुणानो, वेळीच सावध रहा.आई-वडिलांचे संस्कार जन्मभर पुरवणारी आहे.आजी आजोबा तर चालते बोलते विद्यापीठ आहेत. कौटुंबिक नाते हीच शेवटपर्यंत साथ देत असते. नात्यामुळे एकत्र जगण्याची प्रेरणा मिळते.मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजातील नात्यामुळे समाज सोडून बाहेर जाता येत नसते. समाजशील वृत्तीमुळे सामाजिक आणि कौटुंबिक नाते संबंध निर्माण करता येते. मनाच्या ओढामुळे नातेसंबंध जपता येते. प्रेम हे नातेसंबंधांचा मुलभूत आधार आहे.सर्वच नाती जीवन सुंदर बनवतात.नाती आपलं जीवन समृद्ध करतात.नाती ही आपली दुसरा प्राणवायू आहे. कौटुंबिक नाते, मैत्रीचे नाते,गुरु -शिष्यांचे नाते हे अनेक धाग्यांनी बनलेल्या वस्रासारखे असते. 
तत्पूर्वी तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन वक्ते विशाल गरड, संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार ,संस्थेचे खजिनदार ललिता कुंभार,बोराळचे संजीवकुमार कवचाळे,जयश्री कवचाळे ,मुख्याध्यापक रवींद्र वाघमारे,राजकुमार धनवे,प्रा.भिमाशंकर बिराजदार,पंडित कवचाळे, राजकुमार कोळी, महादेव बिराजदार आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सूत्रसंचालन विश्वराध्य मठपती तर  शितल पाटील यांनी आभार मानले.


Reactions

Post a Comment

0 Comments