शांततेत असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज;
महामार्गावर बसेसची जाळपोळ
संपुर्ण राज्यात पडसाद; मुख्यमंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
जालना (कटूसत्य वृत्त):- अंतरावाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आंदोलनस्थळी दगडफेक झाली त्यानंतर पोलिसांनी हवेतगोळीबार करण्यात आला.
गेल्या २९ ऑगस्टपासून मराठा मार्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. पण त्याला विरोध झाल्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तर आंदोलकांनी दगडफेक केली गेली. त्यानंतर आक्रमक आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. पोलिसांनी काल रात्रीच आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो हाणून पाडण्यात आला होता.
आंदोलकांकडून झालेल्या दगडफेकीत १० ते १२ पोलिस जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेनंतर धुळे-सोलापूर महामार्गावर काही वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. या लाठीचार्जनंतर बीड बंदची हाक देण्यात आल्याचे वृत्त समोर आहे. मात्र अद्याप बंद बाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज झालेल्या घटनेचे पडसाद धुळे-सोलापूर महामार्गावर उमटले. मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर धुळे-सोलापूर महामार्गावर काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली.
जालन्यातील शहागड येथे आज मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अलटीमेटम दिला होता. पण आरक्षणाबाबत राज्य सरकारने कोणताही ठोस निर्णय न घेतल्यानं आंदोलनकर्त्यांनी अखेर अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केले होते. जोपर्यंत राज्य सरकार मराठा आरक्षणा बाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा ईशारा उपोषणकर्त्यांनी दिला होता, त्यात आज्ञात समाज कंटकांनी दगड फेक केली. त्यात काही पोलिस अधीकारी कर्मचारी महीला कर्मचारी आणि गावकरी देखील जखमी झाले.
दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठी चार्ज केल्याने महिला आंदोलक जखमी झाल्याचे दिसून येत आहे. तर आंदोलकांच्या दगडफेकीमध्ये पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
संभाजीराजे छत्रपती यांची आक्रमक प्रतिक्रिया
अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्र्यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल. मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल.
अशोक चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सराटी अंतरवालीअशोक चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया, ता.अंबड, जि. जालना येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार करून अश्रुधुराचाही वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या व्हीडीओतून बळाचा अतिरेक स्पष्टपणे दिसून येतो.
मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने समाजाचा अंत पाहू नये. या गंभीर प्रश्नावर केवळ वेळकाढूपणा होत असल्याने समाज संतप्त आहे. बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडता येणार नाही. त्याऐवजी मराठा आरक्षण कसे देणार, याबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि ठोस पावले उचलावीत. नेमके हेच केले जात नसल्याने मराठा समाजातील आक्रोश तीव्र होतो आहे.
शरद पवारांची प्रतिक्रिया
या घटनेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आंदोलक आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली होती. कारण नसताना लाठी हल्ला करण्यात आला आहे. चर्चा झाल्यानंतरही पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. या प्रकरणात गृहखात्याकडून अतिरेकी भूमिका घेतली गेली आहे. या लाठीहल्ल्याचा मी निषेध करतो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. जनतेने शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले
सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली. परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु भाजपाने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढविणारी भूमिका घेतली. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही हि खेदाची बाब आहे. मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठीहल्ला करुन भाजप सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे. भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे. या लाठी हल्ल्याचा निषेध.
.png)
.png)
No comments:
Post a Comment