सोलापूर महापालिकेत सावळा- गोंधळ..!
कचरा डोळ्यात... अन् फुंकर कानात ...!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- 14 लाख लोकसंख्या असणाऱ्या सोलापूर शहरासाठी शहराच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पारदर्शक कारभार करण्यासाठी महानगर पालिकेची स्थापना करण्यात आली. परंतु सध्या या महानगरपालिकेचा कारभार "आंधळं दळतो आणि कुत्रं पीठ खातं" अशाच प्रकारचा होताना दिसतोय. दैनिक कटू सत्य नेहमीच जागल्याची भूमिका घेत आहे. त्याच अनुषंगाने दैनिक कटू सत्यने सोलापूर महापालिके च्या अजब आणि गजब कारभाराचा पर्दाफाश केलाय. सविस्तर वृत्त असे की, - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत असलेल्या योजनेतून वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी सबसिडीचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर दुसरा हप्ता मिळावा म्हणून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून एक लाभार्थी यासाठी प्रशासनाची मनधरणी करतोय. हा लाभार्थी सोलापूर शहरातील असून गेल्या पाच सहा वर्षांपासून न्याय मिळत नसल्याने त्या लाभार्थ्याने तक्रार पीजी पोर्टलवर केली होती. 9 ऑगस्ट 2022 ला वर्ष झालं तरी कोणताच रिप्लाय किंवा प्रतिसाद त्याला मिळाला नाही .तसेच दुसऱ्या हप्त्याचे पैसे त्याला मिळाले नाहीत. एकदा नवे हजार वेळा बँक डिटेल्स आधार कार्ड झेरॉक्स मागितले . आणि त्याची पूर्तता या लाभार्थ्याने वेळोवेळी केली सुद्धा..! अखेर पीजी पोर्टल कडून तक्रार करणाऱ्या लाभार्थ्याला सूचना आली की तुम्ही केलेल्या तक्रारीचा निपटारा आकारण्यात आलेला आहे. आपण समाधानी आहेत का..? "चोराच्या उलट्या बोंबा "या म्हणीप्रमाणे महापालिकेचे मुरदाड आणि निर्ढावलेल्या प्रशासनाने या लाभार्थ्याला स्वच्छालयाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी तब्बल पाच ते सहा वर्ष पळवलं. आणि शेवटी आपण समाधानी आहात का असा प्रश्न विचारून त्याच्या जखमेवर मीठ चोळलं.म्हणूनच या सरकारला म्हणावसं वाटतंय हेच का गरिबांचं आणि कष्टकऱ्यांचे सरकार..!आपलं सरकार ...शासन आपल्या दारी.. बाता हंतय लय भारी.. असेच म्हणण्याची वेळ सध्या नागरिकांवर आलेली आहे. कारण तक्रारकर्त्याने केलेल्या तक्रारीचे निराकरण तर महापालिकेला करता आलंच नाही उलट पक्षी सोलापूर महापालिका आयुक्त शितल तेरी उगले यांच्याकडून तक्रार कर्त्याची तक्रार थेट क्लोज करण्यात आली. आणि रस्त्याचे काम सुरू आहे लवकरच रस्ता पूर्ण होईल असे मोघम उत्तर देऊन कुठल्यातरी रस्त्याचा फोटो अपलोड करून तक्रारकर्त्याची समजूत काढून ही तक्रार पीएसआय पोर्टलवरून महापालिका आयुक्तांनी चक्क क्लोज केली. तक्रार होती वैयक्तिक शौचालयाच्या सबसिडीचे पैसे मिळाले नाहीत म्हणून आणि पालिकेकडून तक्रार क्लोज केली ती रस्त्याचे काम सुरू आहे लवकरच रस्ता होईल असे दाखवून याचाच अर्थ "कचरा डोळ्यात ..आणि फुंकर कानात ..असाच होतो ना..! सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनामध्ये काम करणारे आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सेवा करणारे सेवाभावी अधिकारी सध्या दिसत नसल्यामुळे नुसतच मस्टर भरण्यापुरतं काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांमुळे सध्या अनेक लाभार्थ्यांना अनेक योजनांपासून वंचित राहावं लागत आहे. याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार असल्यामुळे या प्रशासनाचा सर्वसामान्य नागरिकांमधून निषेध करण्यात येत आहे.कारण महापालिकेचा कारभार हा असाच बेजबाबदारपणे आणि कृती शून्य असल्याचे अनेक वेळा दिसून आलेला आहे."दुखणं रेड्याला इंजेक्शन पखालीला" देण्याचं काम महापालिकेचे प्रशासन सातत्याने करताना दिसत आहे. शहरातील विविध प्रश्नांकडे महापालिकेचे लक्ष नसून महापालिकेच्या प्रशासनाविरुद्ध जन आक्रोश मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोलापूर शहराला तब्बल आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे तोही अनिमितपणे यामुळे शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे त्याकडे महापालिका प्रशासन गावी देणे लक्ष देत नाही महापालिका प्रशासनाचा मनमानी आणि अजब कारभार सध्या सुरू असल्याने प्रशासनाच्या या कारभाराच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

No comments:
Post a Comment