कविता मनाचे प्रतिबिंब असते: रमेश घोलप
बार्शी (कटूसत्य वृत्त):- कवी रामचंद्र इकारे यांची कविता समाजातील हरवत चाललेला संवाद,बोथट झालेल्या संवेदना यावर परखडपणे भाष्य करीत असल्याचे प्रतिपादन झारखंडचे उद्योग विभाग संचालक रमेश घोलप यांनी केले. कवी रामचंद्र इकारे यांच्या 'अक्षरांची रांग' व 'माणुसकीचं आभाळ' या संग्रहाचा प्रकाशन सोहळा कवी कालिदास मंडळ ,उमेद प्रतिष्ठान व आनंदयात्री प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित करण्यात आला. इकारे यांना समाजभान असल्याने ते सशक्तपणे 'माणुसकीचं आभाळ' निर्माण करू शकले असे मत रमेश घोलप यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री दिलीप सोपल यांनी इकारे यांची कविता नैराश्य झटकणारी असून त्यांच्या कविता विविध विषयांना स्पर्श करतात असे मत मांडले यावेळी जेष्ठ संपादक राजा माने यांनी कृतज्ञता हा या मातीचा संस्कार इकारे यांच्या अंगी दिसून येतो.शहरातील विविध उपक्रमातील त्यांचा सहभाग हा कौतुकास्पद आणि माणसं जोडणारा आहे असे मत व्यक्त केले. डॉ.राजेंद्र दास यांनी लेखक हा स्वतःशी जास्त बोलत असतो ज्याला स्वतःशी बोलण्याची कला साधते त्याला चांगलं लेखक होता येतं आणि ही कला इकारे यांना साधली असून त्यातून साहित्य निर्मिती होत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी माझी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले ,सरोजनी इकारे, स्वाती इकारे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी रामचंद्र इकारे यांनी आपला शब्दप्रवास मांडला.सचिन वायकुळे, ऋचा इकारे, श्राविका जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश अक्कलकोटे आभार उमेश घोलप तर सूत्रसंचालन अमोल कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रताप दराडे ,जमीर कुरेशी ,हर्षद लोहार ,तन्मय इकारे, उमेश अक्कलकोटे ,उमेश ठोंबरे ,हरिदास कुंभार ,सागर कुलकर्णी, आबासाहेब घावटे,प्रवीण पावले यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment