‘दीड जीबी’मुळे वाटोळे नाही तर मी घडलो; केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशस्वी निहाल कोरे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आपण मोठी ध्येय पाहतो, तेव्हा अंधार असतो. छोटा कंदील घेऊन चालावे लागते आणि जेवढे पुढे पाऊल टाकतो, तेवढा प्रकाश निर्माण करण्याची हिम्मत वाढते. तारुण्य, त्याग, तपश्चर्या आणि संघर्ष या चतु:सूत्रीचा वापर करा.
आपल्याकडील आयुधांच्या वापरावर यश अवलंबून आहे, अर्थात दीड जीबीने सगळेजण वाटोळे केले म्हणतात, पण मी त्यामुळेच घडलो, असा अनुभव केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादित केलेले निहाल कोरे यांनी सांगितला.
वसुंधरा महाविद्यालयात आयोजित ‘परीक्षा-स्पर्धा परीक्षा’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत नुकतेच घवघवीत यश संपादित केलेल्या निहाल कोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा.डॉ. गौतम कांबळे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे, प्राचार्य डॉ. मीना गायकवाड, असिफ यत्नाळ आदी उपस्थित होते.
प्रारंभी स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन प्रा. डॉ. कांबळे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक प्रा. डॉ. सुहास उघडे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रदीप कोल्हे यांनी करून दिला.
कोरे म्हणाले, युपीएससीच्या मागण्या वेगळ्या आहेत. पर्वतावर ओझं घेऊन जाता येत नाही, अनावश्यक वजन खाली ठेवूनच पर्वत चढावा लागेल. तर प्रा. डॉ. कांबळे म्हणाले, स्पर्धा परीक्षेचे नुसते आकर्षण असून चालत नाही, तर त्यासाठी अव्याहत प्रयत्न करावे लागतात.
तसेच प्राचार्य डॉ. मीना गायकवाड यांनी प्रत्येक व्यक्तीने आत्मविश्वास, सामाजिक जाणीव ठेवून कार्य करत राहणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. संगीता भोसले यांनी केले तर आभार डॉ. किशोर जोगदंड यांनी मानले.
.png)
No comments:
Post a Comment