मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या व स्नेहदा मसिकाच्या वतीनें, समाजभूषण पत्रकार, श्री नासिकेत पानसरे, ह्यांचा सत्कार

मुंबई (नासिकेत पानसरे):- मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, व स्नेहदा मासिकाच्या वतीनें, महाराष्ट्र शासनानें गौरवलेलें, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त, पत्रकार श्री नासिकेत पानसरे ह्यांचा सत्कार, ज्येष्ठ साहित्यिक व कोमसापचे संस्थापक सदस्य, डॉ. सुनील सावंत यांच्या शुभहस्तें, विक्रोळी कन्नमवार नगर मध्यें करण्यांत आला. याप्रसंगीं आपण देहदान करणार असल्याचे त्यांनी सभेत घोषित केले. भारताच्या ७५ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेली अनेक वर्षे देहदानाचे कार्य करणाऱ्या, श्री. उमाकांत सावंत संपादित स्नेहदा मासिकाचा वर्धापन दिन सुद्धां साजरा करण्यात आला.
आज भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे, तरी अजून भारतीय राज्यघटना जनसामान्यांमध्यें पोंहोचलेलीं नाहीं, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक श्री सुनील सावंत यांनी व्यक्त करतांना, प्रत्येक भारतीयानें घटना वाचली पाहिजे, असें सांगितलें. भारतीय संविधानात आपल्या देशाची भारत आणि इंडिया अशी दोन नांवें आहेत. जगांत कुठल्याही देशाची दोन नांवें नाहींत - नसतात. आपल्या देशाचे नांव एकच असलें पाहिजे, असा दावा श्री सावंत यांनी सभेत बोलतांना केला. देशांत समान नागरी कायदा आवश्यक आहे, असें सांगताना मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठीं, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, असें तें पुढें म्हणाले. भारतामध्यें विशेषतः तरुणांमध्यें नैराश्याचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळें तें आत्महत्या करतात. हें टाळण्यासाठींच, प्रत्येकानें आपले कौटुंबिक नाते जपतांना मित्र, मैत्रिणी, कुटुंबाशी संवाद साधून मन मोकळें करावें, तरच आपण नैराश्य थांबवूं शकतो, असा मौलिक सल्ला श्री. सावंत यांनी दिला.
मिलिटरीची वर्दी घातल्यानंतर देशासाठीं काम करायचें, घरीं आला तर तो आपला, नाहीं आला, तर तो देशासाठींच अर्पण असतों, असें भारताचे माजी सैनिक श्री.वासुदेव उर्फ बी.टी. जंगम यांनीं सांगितलें.
आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाहीं, प्रत्येकानें आपला परिसर स्वच्छ ठेवावा, सकाळीं कुत्रे फिरवितांना त्यांचे मालक आपल्यासमोर कुत्र्याची विष्ठा मैदानें रस्त्यावर टाकत असल्याचे पहावयास मिळते. या पवित्र धरतीवर घाण करूं नये, असें प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या जयश्री खिल्लारी यांनीं सांगितलें.
या प्रसंगी आयोजित केलेल्या कवी संमेलनामध्यें कवी उमेश जाधव, श्रद्धा बनसोडे, प्रभाकर रामराजे, ८० वर्षाचे कवी विलास बसवंत, दया घोंगे, सविता काळे ह्यांनीं आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता काळे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीं स्नेहदाचे संपादक श्री उमाकांत सावंत, श्री सुनील कुबल, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय विक्रोळी शाखेच्या वनिता धाडीगांवकर, रेखा हिवाळे यांनी बरीच मेहनत घेतली होती.
No comments:
Post a Comment