नवतरुण मित्र मंडळाच्या पुढाकाराने आमडोशी ग्रामस्थांचे आमडोशीत वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन जबाबदारीची भीष्मप्रतिज्ञा..!

बोरघर / माणगाव (कटुसत्य वृत्त) : सोळाव्या शतकात जगदगुरु संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेल्या व गायलेल्या " वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळवीति ! " या अभंगातून आपल्याला हिरव्यागार वनस्पती, झाडे तथा वृक्ष वल्ली यांचे निसर्गातील तथा पर्यावरणातील आणि मानवी जीवनातील असलेले अनन्यसाधारण महत्त्व प्रकट केले आहे. निसर्ग सृष्टीतील प्रत्येक सजीवाला आपले जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू , पाने, फुले, फळे, सरपण, इमारती लाकूड, वनौषधी व आयुर्वेदिक औषधे आपल्याला वनस्पती तथा वृक्ष वल्ली मधून प्राप्त होतात. मानवी जीवनात प्राणवायूचे महत्त्व कीती अनन्यसाधारण आहे हे आपण सर्वांनी मागील दोन तीन वर्षांतील कोवीड १९ च्या संक्रमण काळात प्रत्यक्ष अनुभवले आहे.
त्यामुळे जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या या लोकप्रिय अभंगाचे महत्व ओळखून या अभंगाची महती अभंग आणि अबाधित ठेवण्यासाठी रविवार दिनांक १० जुलै २०२२ रोजी आमडोशी येथील स्थानिक व मुंबई स्थीत नवतरुण मित्र मंडळ यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन सोहळ्यात संपूर्ण ग्रामस्थ आणि निमंत्रित प्रमुख मान्यवर यांनी सक्रिय सहभाग घेऊन सदर कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन आमडोशी गावातील नव तरुणांनी केले होते त्यांना ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ आणि मुंबईकर मंडळ यांचे खूप चांगले सहकार्य लाभले. या वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन कार्यक्रमासाठी सदर नव तरुणांना मुंबईतील काही डॉक्टर आणि गावातील दानशूर व्यक्तींनी चांगल्या प्रकारे आर्थिक सहकार्य केले.
सदर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम प्रसंगी सर्वांना आलेला प्रत्यक्ष अनुभव पुढील प्रमाणे होता.
सदर कार्यक्रमास आमडोशी नवतरुण मित्र मंडळ, ग्रामस्थ , मुंबईकर मंडळ तसेच महिला मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मंडळाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे आणि गावातील सर्व ग्रामस्थांचे तसेच महिला मंडळाचे आमडोशी नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
रविवारी दुपारी १२ वाजल्या पासून सुरू झालेला वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम अगदी काळोख होईपर्यंत तरुणांनी अगदी उत्साहात पूर्ण केलं. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच, सलाम त्यांच्या जिद्दीला.
आता या पुढे देखील आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ती म्हणजे हे प्रत्येक झाड आपण खूप मेहनतीने लावलं आहे.त्याला जपणं त्याच संवर्धन करणे हे आपल्या गावातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. अशी भीष्म प्रतिज्ञा केली.
No comments:
Post a Comment