Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर तालुक्यात 13 हजार 390 हेक्टरवरील पिक नुकसानीचे पंचनामे- प्रांताधिकारी-सचिन ढोले

 पंढरपूर तालुक्यात 13 हजार 390 हेक्टरवरील पिक नुकसानीचे पंचनामे- प्रांताधिकारी-सचिन ढोले

पंचनाम्यासाठी 109 पथकांची नियुक्ती


 

  पंढरपूर (क.वृ):-  अतिवृष्टीमुळे तसेच धरणातून सोडण्यात आलेल्या वीसर्गामुळे तालुक्यात नदी काठच्या गावांसह शेती पिकांचे  तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  या नुकसानीचे पंचनामे  कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकामार्फत करण्यात येत असून, आतापर्यत  13 हजार 390 हेक्टरवरील पिक नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाले असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

तालुक्यात शहरासह  एकूण  95  गावांमधील  10 हजार 712 शेतकऱ्यांचे 13 हजार 390  हेक्टरवरील पिकांचे पंचनामे  आतापर्यंत पुर्ण झाले आहेत. तसेच शहरातील 5 हजार 396 घरांचे तर 542 दुकानांचे पंचनामे करण्यात आले असून, ग्रामीण भागातील 4 हजार 712 घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. पिक नुकसानीचे, बाधित घरांचे व क्षेत्राचे  पंचनामे करण्यासाठी शहरासह तालुक्यात  109 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त सर्वच क्षेत्रांवरील  पंचनामे करण्याच्या सूचनास संबधित पथकाला दिल्या असल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले 




परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी झाल्याने  शेत पिकांचे मोठे नुकसान झाले असून, तालुक्यातील ऊस, , मका, कांदा, ज्वारी  आदी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील अतिवृष्टीमुळे तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरच पुर्ण करुन नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणारअसल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.

तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत पिकांची पाहणी लोकप्रतिनिधीसह, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसिलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका कृषि अधिकारी राजेंद्र पवार यांनी केली.

तसेच अतिवृष्टीमुळे व धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे चंद्रभागानदीला पूर आल्याने शहरातील नदीकाठावरील लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी मुख्याधिकारी  अनिकेत मानोकर यांनी केली  तसेच  पुराच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी चिखल झाला आहे. यामुळे रोगराई पसूरु नये यासाठी नगरपालीकेच्या आरोग्य विभामार्फत स्वच्छता व औषध फवारणी करण्यात येत  असल्याचे मुख्याधिकारी मानोरकर यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments