अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत - आ.शहाजीबापू पाटील

सांगोला दि.१८(क.वृ.): तालुक्यामध्ये बुधवार दि.16 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये अनेक नागरिकांच्या घरांचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने संबंधित नुकसानीचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शासनास सादर करावेत अशा आशयाचे लेखी पत्र काल गुरुवार दि.17 रोजी आ.शहाजीबापू पाटील यांनी तहसीलदार यांना दिले आहे.
तालुक्यामध्ये बुधवार दि.16 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडला असल्याने सांगोला तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे, नागरिकांच्या घरांचे व जनावरांचे मोठे नुकसान झाले असल्याच्या घटना घडल्या आहेत. सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका असल्याने येथील शेतकऱ्याचे जीवन हे शेतीवर मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर अवलंबून असते. यामध्ये देखील निसर्गाने घात केला तर शेतकऱ्यांचे जीवन हे विस्कळीत होऊन जाते. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व नवी उमेद मिळण्यासाठी शासनाकडून नुकसानभरपाई मिळणे गरजेचे असते. त्यामुळे बुधवारी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील ज्या ठिकाणी पिके व घरांचे नुकसान झाले आहे त्या सर्व ठिकाणचे तातडीने पंचनामे करून शासनास सादर करावेत. जेणेकरून संबंधित नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसानीची नुकसानभरपाई शासनाकडून मिळू शकेल असा आशयाचे लेखी पत्र आमदार शहाजीबापू पाटील यांनी काल गुरुवार दिनांक 17 रोजी तहसीलदार योगेश खरमाटे यांना दिले आहे.
0 Comments