जिल्ह्याचा विकास करुन पहिल्या पाच क्रमांकावर आणण्यासाठी कटिबद्ध : सुभाष देशमुख
महाराष्ट्रातील पहिल्या पाच क्रमांकाच्या यादीत सोलापूर जिल्ह्याचे नाव येण्याकरिता तत्परतेने कार्य करण्यासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध सामाजिक उपक्रमांमधून प्रत्येक क्षेत्रात दर्जेदार काम करण्यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन काम करत आहे. सोमवारी सकाळी या सामाजिक संस्थेतील संचालक, सल्लागार व सदस्यांची बैठक माजी सहकारमंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
सदर बैठकीत सोलापूरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व समाजसेवक यांच्या उपस्थितीत सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वर्षभरातील विविध सामाजिक उपक्रमांची माहिती घेऊन पुढील काळात राबविण्यात येणारे आगामी उपक्रमांची आखणी करण्यात आली. ग्रामीण भागाच्या विकासाकरता समृद्ध गाव व शहरांमध्ये समृद्ध प्रभाग या अंतर्गत नियोजनबध्द कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. समृद्ध गाव अंतर्गत गावांमध्ये शाश्वत विकासासाठी शासन व लोकसहभागातून पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, कृषी, व्यसनमुक्ती, रोजगार, महिला उद्योग, जलसंवर्धन, तीर्थक्षेत्र विकास, आदर्श कुटुंब संकल्पना या विषयांवर काम करून गाव समृद्धीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याचे नियोजन करण्याचे आवाहन सुभाष देशमुख यांनी यावेळी बोलताना केले.
शहरी भागातील विविध प्रभाग अंतर्गत पर्यावरण, शासकीय योजना आणि उपक्रम, आरोग्य, महिला व्यवसाय प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगार अशा विषयांवर शासन व लोकसहभागातून सोलापूर सोशल फाउंडेशन हे कार्य करणार असल्याचे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.
या बैठकीकरिता फाऊंडेशनच्या संचालिका पूर्वा वाघमारे, सल्लागार रवींद्र मिनियार, नरेंद्र काटीकर, अमित जैन, शिवाजी पवार, सिकंदर नदाफ, माजी सैनिक शामराव कदम, ट्रेनर अनीष सहस्त्रबुद्धे, तारासिंग राठोड, सचिन झिंजाडे, मदन बुरकुल, विजय पाटील, मुख्य समन्वयक दत्तात्रय चौगुले, अनिल कांबळे, विपुल लावंड, मृणालिनी मोरे आदी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment