अकलूज (प्रतिनिधी) ः- केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाच्या योजनांना मागणीप्रमाणो निधी उपलब्ध होत नाही. याबद्दल चालू अधिवेशनात मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. या बोर्डाच्या योजनांची माहिती देण्यासाठी २० ऑगस्ट रोजी अकलूज येथे एक कार्यशाळा आयोजित केल्याचे खा. मोहिते-पाटील यांनी सांगितले.राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाचे कार्यकारी संचालक डॉ.ए.के. सिंग यांच्याशी नवी दिल्ली येथे चर्चा झाल्यानंतर माढा लोकसभा मतदार संघात या योजनांचा लाभ शेतकर्यांना मिळवून देण्यासाठी खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आज (शनिवार) अकलूज येथे एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाचे संचालक डॉ.के.सी. तोमर, कृषीभूषण नंदिनीदेवी मोहिते-पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र सावंत, जिल्हा परिषदेचे पक्षनेते धैर्यशील मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय भिलारे, शंकररत्न शुगरचे एक्झिकेटीव डायरेक्टर किर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, शिवामृत दूध संघाचे कार्यकारी संचालक दीपक रेलान, सहकार महर्षी कारखान्याचे शेतकी अधिकारी संतोष कुमठेकर, राहुल जावळे आदी उपस्थित होते. खा.मोहिते-पाटील म्हणाले, या बोर्डाच्या योजनांसाठी वार्षिक एक हजार कोटीचे बजेट असते. प्रत्यक्षात मात्र दोन आडीचशे कोटीचाच निधी उपलब्ध होत आहे. शेतकर्यांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या या योजनेसाठी हवा तेवढा निधी उपलब्ध झाला पाहिजे. महाराष्ट्रात या योजनेसाठी ५० कोटींचे प्रस्ताव आहेत. गतवर्षी राज्यात ३६ कोटींची मागणी होती निधी मात्र २८ कोटींचा उपलब्ध झाला.
या बोर्डाच्या योजनांची माहिती शेतकर्यांना नव्याने उपलब्ध करून देण्यासाठी २० ऑगस्ट रोजी अकलूज येथे कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत प्रगतशील शेतकरी, बँकांचे अधिकारी व राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी शेतकर्यांना मार्गदर्शन करतील.
या योजनेत फळे, फुले आणि भाजीपाला पिकवणो आणि त्याचे मार्केटिंग करणो त्याशिवाय प्रक्रिया उद्योग उभारणो यासाठी कर्ज आणि अनुदान देण्यात येते. केंद्र सरकारची ही योजना आहे. या योजनेचा सहज व सुलभ रित्या लाभ शेतकरी बांधवांना झाला पाहिजे असे खा. मोहिते-पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment