पंतप्रधान अन् आठवले साहेबांमुळे सामाजिक न्यायाला खरी दिशा-डॉ.हुलगेश चलवादी
निधीचा पारदर्शक वापर, डीबीटी , नियमित देखरेखीमुळे लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा थेट लाभ
पुणे (कटूसत्य वृत्त):- कल्याणकारी योजनांचा निधी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे हीच सामाजिक न्यायाची खरी दिशा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेबांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे सर्व शक्य होत असल्याचे मत आरपीआय (ए) चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी सोमवारी (ता.३१) व्यक्त केले.
अनुसूचित जातीच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर सातत्याने देखरेख ठेवण्यात येत असून, योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी डिजिटल यंत्रणा आणि थेट लाभ हस्तांतरणावर विशेष भर दिला जातोय, हे विशेष.
अनुसूचित जातींसाठीच्या पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीला २०२५-२६ मध्ये ६,३६० कोटी, प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना (PM-AJAY) साठी २,१४० कोटी, तर SHREYAS अंतर्गत विविध शैक्षणिक योजनांसाठी ४७२ कोटींची तरतूद सरकारने केली आहे.
PM-AJAY अंतर्गत २०२१-२२ पासून आतापर्यंत हजारो गावांच्या विकासाला चालना मिळाली असून, २०२६ मध्ये १७,०६७ गावे आदर्श ग्राम म्हणून घोषित झाली आहेत. या गावांमधील २.६५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात लाभ मिळाला आहे. तसेच २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी ९० वसतिगृहे मंजूर करण्यात आली असून, त्याचा १०,६४९ विद्यार्थ्यांना लाभ झाला असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
निधीच्या वापराचे नियमित पुनरावलोकन, सामाजिक लेखापरीक्षण, डिजिटल निधी व्यवस्थापन आणि डीबीटी यामुळे पारदर्शकता वाढत आहे. केंद्र व राज्यांच्या समन्वयातून योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करून अनुसूचित जाती समाजाच्या शिक्षण, रोजगार आणि सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणाला नवी गती मिळतेय, असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.

No comments:
Post a Comment