सोलापूर भाजपमध्ये जुन्या नेतृत्वाची अस्वस्थता; सुभाष देशमुखांच्या वक्तव्याने अंतर्गत समीकरणे चर्चेत!
सोलापूरच्या राजकारणात भाजपची ताकद वाढविणाऱ्या जुन्या पिढीतील नेतृत्व आणि पक्षात वेगाने पुढे येणाऱ्या नव्या नेतृत्वामधील संघर्ष आता अधिक स्पष्टपणे समोर येण्याची चिन्हे आहेत.
माजी मंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्यामुळे या अंतर्गत संघर्षाला पुन्हा तोंड फुटले आहे. विरोधकांशी राजकीय लढा देताना ज्या प्रकारचे सहकार्य आणि राजकीय सौजन्य अनुभवले, तेच आपल्या पक्षातील काही नेत्यांकडून मिळत नसल्याची खंत त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या नाराजीमागे केवळ वैयक्तिक मतभेद आहेत की भाजपमधील बदलत्या नेतृत्व-समीकरणांची ही प्रतिक्रिया आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
सोलापूरमध्ये भाजपची राजकीय पायाभरणी करण्यामध्ये सुभाष देशमुख यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या काळात त्यांनी पक्षाचा विस्तार केला, निवडणुका लढवल्या आणि संघटनात्मक पातळीवर नेतृत्व उभे केले. विधान परिषद, लोकसभा आणि विधानसभा अशा विविध पातळ्यांवर त्यांनी राजकीय ताकद सिद्ध केली. मात्र, गेल्या काही वर्षांत सोलापूर भाजपमध्ये नव्या नेतृत्वाची स्वतंत्र ताकद निर्माण होत गेली. देवेंद्र कोठे, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे यांसारख्या नेत्यांचा वाढता प्रभाव आणि संघटनेतील बदलती रचना यामुळे पूर्वीच्या नेतृत्वाची राजकीय मध्यवर्ती भूमिका हळूहळू कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूरच्या प्रशासकीय आणि राजकीय प्रक्रियेतील वाढता सहभाग हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरतो. स्थानिक ज्येष्ठ नेतृत्वाला विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याची भावना निर्माण झाली, तर त्यातून नाराजी वाढणे स्वाभाविक आहे. देशमुख यांनी काही बैठका आणि कार्यक्रमांपासून अंतर ठेवणे, तसेच अन्य पक्षांच्या मंत्र्यांच्या भेटीगाठी घेणे, या राजकीय हालचाली केवळ औपचारिक घटना मानता येणार नाहीत. त्या माध्यमातून स्थानिक नेतृत्व आपली स्वतंत्र राजकीय ताकद अद्याप कायम असल्याचा संदेश देत आहे, असे या घडामोडींकडे पाहता येते.
महापालिकेच्या राजकारणाने या संघर्षाला आणखी एक परिमाण दिले.. सोलापूर महापालिकेतील सत्तासमीकरणात देवेंद्र कोठे यांच्या गटाची वाढलेली ताकद आणि देशमुख गटाशी निर्माण झालेली स्पर्धा यामुळे भाजपच्या अंतर्गत गटांचे राजकारण अधिक ठळक झाले. महापौरपदाच्या समीकरणापासून स्थानिक संघटनात्मक निर्णयांपर्यंत कोणत्या गटाचे वर्चस्व राहणार, हा प्रश्न यापुढील राजकारणात निर्णायक ठरू शकतो.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील समीकरणांनी मात्र देशमुखांच्या नाराजीला वेगळे राजकीय स्वरूप दिले. सुभाष देशमुखांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेले दिलीप माने यांच्यासोबत भाजपने केलेली राजकीय जुळवाजुळव आणि त्यानंतर माने यांचा भाजप प्रवेश, हा देशमुखांसाठी केवळ एका नेत्याचा पक्षप्रवेश नसून स्थानिक राजकारणातील पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा संकेत म्हणून पाहिला गेला. एखाद्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रभावक्षेत्रात त्याच्याच राजकीय प्रतिस्पर्ध्याला स्थान मिळणे, हा कोणत्याही पक्षातील सत्तासमीकरण बदलण्याचा प्रभावी मार्ग असू शकतो.
मात्र, या सर्व घडामोडींमागे थेट 'सुभाष देशमुखांना संपविण्याचा भाजपचा कट' आहे, असा निष्कर्ष काढणे राजकीयदृष्ट्या घाईचे ठरेल. भाजपसारख्या विस्तारलेल्या पक्षात स्थानिक नेतृत्वांची संख्या वाढविणे, एकाच नेत्यावर अवलंबित्व कमी करणे आणि पुढील पिढीतील नेतृत्वाला संधी देणे ही संघटनात्मक रणनीती असू शकते. त्यामुळे सध्याच्या संघर्षाकडे व्यक्तीविरोधापेक्षा नेतृत्वाच्या संक्रमणाची प्रक्रिया म्हणून पाहणे अधिक योग्य ठरू शकते.
यातच देशमुखांच्या वक्तव्याचा राजकीय अर्थ महत्त्वाचा ठरतो. 'आम्ही शरद पवार सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात एवढी लढलो त्यांनी कधीही विरोधक असूनही त्रास दिला नाही; मात्र आपल्याच लोकांना उपकारांची जाणीव नाही' या आशयाची त्यांची खंत ही केवळ भावनिक प्रतिक्रिया नसून पक्षांतर्गत संवादातील दुरावा किती वाढला आहे, याचे संकेत मानले जात आहेत. ज्येष्ठ नेतृत्वाला सन्मान आणि निर्णयप्रक्रियेत स्थान हवे आहे, तर नव्या नेतृत्वाला स्वतंत्र राजकीय अवकाश हवा आहे. या दोन अपेक्षांमध्ये समन्वय न झाल्यास गटबाजी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे सुभाष देशमुख एकटेच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे घटक नाहीत. सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह दोन्ही देशमुखांची स्थानिक राजकीय ताकद आणि कार्यकर्त्यांशी असलेले संबंध भाजपसाठी दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नेतृत्वाला पूर्णपणे बाजूला करण्याचा कोणताही प्रयत्न उलट पक्षासाठीच संघटनात्मक आव्हान निर्माण करू शकतो. दुसरीकडे, केवळ जुन्या राजकीय प्रभावाच्या आधारावर नव्या नेतृत्वाचा उदय रोखणेही भाजपच्या विस्ताराच्या धोरणाशी विसंगत ठरू शकते.
त्यामुळे सोलापूर भाजपसमोरील खरी कसोटी 'कोणाला संपवायचे' यापेक्षा जुन्या आणि नव्या नेतृत्वामध्ये सत्ता, सन्मान आणि निर्णयाधिकाराचे संतुलन कसे साधायचे, ही आहे. आगामी स्थानिक आणि विधानसभा राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हे समीकरण अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. देशमुखांची नाराजी पक्षांतर्गत संघर्षात परिवर्तित होते की वरिष्ठ नेतृत्व मध्यस्थी करून हा तणाव कमी करते, यावर सोलापूर भाजपच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.

No comments:
Post a Comment