सोलापूर ZPतील सभागृहाचे 'शिवरत्न' नाव हटविले
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक आज अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या बैठकीत सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहाचे 'शिवरत्न' हे नाव बदलून 'भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह' असे नामकरण करण्यात आले आहे, त्याची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.
त्यातून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी सभागृहाचे 'शिवरत्न' हे नाव बदलून 'भारतरत्न अटबिहारी वाजपेयी सभागृह' करण्याचा ठराव मांडला. उपाध्यक्ष पवार यांनी मांडलेला ठराव एकमताने मंजूर करण्यात आला, त्यामुळे जिल्हा परिषदेला अनेक वर्षे जोडलेले शिवरत्न नाव आता झेडपीतून पुसले जाणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे शिवरत्न नाव बदलण्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे विरोधकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या ठरावासोबतच इतरही अनेक महत्वपूर्ण या सभेत मंजूर करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील ११ तालुक्यांत ११ आदर्श शाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातून प्रत्येक तालुक्यात दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे.विकास कामांना गती देण्यासोबतच त्याची गुणवत्ता, पारदर्शकता आणि नागरिकांना प्रभावी सेवा मिळावी, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
डी. वाय. पाटलांना श्रद्धांजली अर्पण
दरम्यान, बैठकीच्या सुरुवातीलाच माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर स्थायी समितीच्या २५ जूनला झालेल्या बैठकीचे कार्यवृत्त वाचून कायम करण्यात आले.
या वेळी शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, समाजकल्याण समिती सभापती संस्कृती सातपुते, समिती सदस्य पृथ्वीराज माने, आदिनाथ देशमुख, रश्मी बागल, बालाजी नरुटे आणि रमेश श्रीमंत भांजे, तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते.
.jpg)
No comments:
Post a Comment