मंत्री संजय सावकारे यांना पंढरपुरात अडवले
जरांगे पाटील यांच्या उपोषणाची तातडीने दखल घेण्याची मागणी
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाची महाराष्ट्र सरकारने तातडीने दखल घ्यावी आणि मराठा समाजाच्या न्याय्य व हक्काच्या मागण्या मान्य कराव्यात, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री संजय सावकारे यांना पंढरपूर येथे अडवून निवेदन दिले.
मनोज जरांगे पाटील हे सातत्याने उपोषणाला बसल्याने त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकारने या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहून मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
“मनोज जरांगे पाटील यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास महाराष्ट्रात उग्र स्वरूपाची आंदोलने होतील. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल,” असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख किरण घाडगे यांनी दिला.
सरकारने केवळ आश्वासने न देता मराठा समाजाच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे असल्याचे घाडगे यांनी सांगितले. आंदोलनाची तीव्रता वाढण्यापूर्वी सरकारने संवाद साधून तोडगा काढावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
मंत्री संजय सावकारे यांना पंढरपुरात अडवून करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे काही काळ राजकीय वातावरण तापले. सरकारने मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला.

No comments:
Post a Comment