कारगील विजय दिवसानिमित्त शहीद वीरांना अभिवादन
कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील वीर पत्नी, वीर माता आणि वीर पित्यांचा शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच वसतिगृह व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा भारतीय माजी सैनिक संघटना, सोलापूरचे अध्यक्ष अरुणकुमार तळीखेडे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कारगील विजय दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत शहीद जवानांच्या शौर्य, त्याग व बलिदानाला अभिवादन केले.
मेजर मिलिंद देवदत्त तुंगार (नि.) यांनी कारगील युद्धातील शहीद सैनिकांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, ३ मे १९९९ ते २६ जुलै १९९९ या कालावधीत भारतीय सैन्याने कारगील क्षेत्रात पाकिस्तानविरुद्ध पराक्रम गाजवत अशक्यप्राय विजय संपादन केला. या युद्धात सुमारे ५३७ भारतीय सैनिकांनी मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या शौर्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जुलै हा दिवस देशभरात कारगील विजय दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कायम उभे राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. संजीव व्यंकटराव पवार यांनी केले.
या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, विविध माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक, त्यांचे अवलंबित तसेच अन्य मान्यवर मिळून सुमारे ७५ जण उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहार व चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती.
.png)
No comments:
Post a Comment