काँग्रेसला धक्का, अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 3, 2026

काँग्रेसला धक्का, अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद

 काँग्रेसला धक्का, अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या विधानपरिषद निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जो-तो पक्ष आपापल्या उमेदवाराला निवडून आणण्याासाठी प्रयत्न करत आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही 4 जून असल्याने बंडखोरांची मनधरणी करण्याच्या दिव्याला त्या-त्या पक्षाचे प्रमुख तोंड देत आहेत. महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही अनेक ठिकाणी काही नेत्यांनी पक्षादेश झुगारून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड भरण्याची शक्यता असली तरीही महाविकास आघाडीनेदेखील या निवडणुकीसाठी पूर्ण जोर लावला आहे. यावेळी काँग्रेसने आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख जवळ आलेली असतानाच आता काँग्रेसला सोलापुरात जबर धक्का बसला आहे. येथे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा अर्जच थेट बाद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्जच बाद झाला आहे. येथे काँग्रेसने आदित्य फत्तेपूरकर यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यांचा उमेदवारी अर्ज आता बाद झाला आहे. काँग्रेसचे सूचक नागेश भोसले यांची सही बोगस असल्याचे अर्ज पडताळणीत स्पष्ट झाले. त्यामुळेच फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे.

नागेश भोसले यांनी दिले स्वयंघोषणापत्र

मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसून मी फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सही केलेली नाही, असे नगरसेवक नागेश भोसले यांनी स्वयंघोषणापत्रात म्हटलेले आहे. हे स्वयंघोषणापत्र निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्यामुळे त्याचाच अधिर घेत आता काँग्रेसच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे.

10 पैक 9 सूचक राहिले

नागेश भोसले यांनी सही माझी नसल्याचे स्वयंघोषणापत्र दिल्याने काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांना 10 पैकी केवळ 9 सूचक राहिले. त्यामुळेच त्यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवण्यात आला. दरम्यान, फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यामुळे सध्या तेथे काही काळी तणावाची स्थिती निर्माण झाली. दरम्यान, आता काँग्रेसच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्जच बाद झाल्याने पुढे काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages