अकलूज येथील गायत्री क्षीरसागर बनली मुंबई पोलिस
अकलूज (विलास गायकवाड):- नुसते पंखात बळ असून चालत नाही तर आकाशाला गवसणी घालण्यासाठी इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असणेही तेवढेच गरजेचे आहे. हालाकीचे आणि गरिबीचे चटके सहन करत पंचवटी अकलूज येथील कु.गायत्री रत्नकांत क्षीरसागर या मुलीने मुंबई पोलिस होण्याचा मान मिळवला असून सर्व स्तरातून तिच्यावरती कौतुकांचा वर्षाव होऊ लागला आहे.
1 ली ते 4 थी जिल्हा परिषद शाळेत तर 5 वी ते 12 वी दि मॉडेल विविधांगी प्रशाला माळीनगर तर टीवायबीए शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय कॉलेज माळेवाडी अकलूज असा शैक्षणिक प्रवास सुरू असताना, लहानपणापासून पोलीस होण्याची जिद्द बाळगलेल्या, गायत्रीने शिक्षण घेत असतानाच, पोलिस होण्याची इच्छा पूर्ण करून दाखवली. दैनिक कटूसत्यशी बोलताना गायत्री म्हणाले की तीन वर्षाच्या कठीण प्रयत्नानंतर, यावेळी माझी निवड झाली, आता एवढ्यावरच थांबणार नाही असा आत्मविश्वास तिने व्यक्त केला.
पिढ्यान पिढ्या वाट्याला आलेल्या गरिबीवर मात करत आमच्या गायत्रीने पोलीस होऊन दाखवले आणि आमच्या जीवनाचे व संस्काराचे सार्थक केले. यापुढेही तिच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही तिचे आई वडील रक्ताचे पाणी करु परंतु तिला कुठेही कशाचीही कमकरता भासू देणार नाही.असे शब्दवचन गायत्रीच्या आई वडिलांनी दिले. यावेळी त्यांनी, त्यांच्या डोळ्यातील आनंदअश्रुला वाट मोकळी करून दिली नाही आणि दाटून आलेल्या कंठालाही फुटू दिले नाही.कारण मुलीच्या कर्तुत्वाने भारावलेल्या मनाला विचलितं होऊ दिले नाही. अर्धवट भुकेवर तृप्त होणारे आम्ही,आमचे मन कसे विचलित होऊ देऊ! मुलांचे स्वप्न साकार करण्यासाठी, दुसऱ्याच्या शेतामध्ये, रक्त करपवणाऱ्या दाहकतेचा सामना करत, कर्तव्य पार पाडणारे आम्ही, आमचे मन कसे विचलित होऊ देऊ! कर्तुत्वाला आणि कर्तव्याला कसलीही सीमा नाही तसेच कष्टाला कसलाही पर्याय नाही, मग आम्ही आमचे मन कसे विचलित होऊ देऊ , हे न सांगताही ते बोलून गेले यालाच आईची माया,ममता,आणि वात्सल्य म्हणतात.
अहोरात्र काबाडकष्ट करून,मुलांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या माता पित्याला नतमस्तक प्रणाम अशा भावना काहींनी व्यक्त केल्या.
.png)
No comments:
Post a Comment