पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या- खा. प्रणिती शिंदे
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यात अचानक आलेल्या वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे अनेक गावांतील केळी बागांचे, फळबागांचे तसेच इतर शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जनावरांचे गोठे, घरांची छप्परे आणि इतर मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.
आज खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी निदर्शनास आले. नुकसान होऊन पाच दिवस उलटून गेले तरी प्रशासनाकडून अनेक ठिकाणी पंचनामे करण्यात आले नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मोहोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये केळी बागा पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या, तसेच मालमत्तेचेही नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.
या कठीण प्रसंगी मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ सतर्क राहून प्रत्यक्ष पाहणी व पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नुकसानग्रस्तांना शक्य तितक्या लवकर मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
.png)
No comments:
Post a Comment