सोलापुरात उष्णतेचा कहर; नागरिकांना सावधतेचे आवाहन
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- मे महिन्याच्या सुरुवातीलाच सोलापूर शहरात उन्हाचा तीव्र कहर जाणवू लागला आहे. रविवारी शहरातील कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. प्रखर उन्हामुळे नागरिकांची अक्षरशः लाहीलाही होत असून दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
शनिवारी ४२.८ अंश तापमान नोंदवले गेले होते. त्याच्या तुलनेत रविवारी तापमानात ०.६ अंशांची किरकोळ घट झाली असली तरी उष्णतेची तीव्रता कायम आहे. एप्रिल महिन्यापासून तापमान सातत्याने वाढत असून मागील २४ दिवसांपासून पारा ४० अंशांच्या वरच राहिला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक ठरत आहे.
हवामान विभागाने पुढील आठवडाभर उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवेतील कोरडेपणा वाढल्याने उन्हाची झळ अधिक जाणवत आहे.
उन्हाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बाहेर पडताना डोक्यावर टोपी, गॉगल व हलके सुती कपडे वापरावेत. भरपूर पाणी, ताक, लिंबू सरबत आदी पेयांचे सेवन करावे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

No comments:
Post a Comment