सोलापूर(कटूसत्य वृत्त):- महानगरपालिका प्रभाग क्रमांक १२ मधील आशा नगर परिसरात बुधवार (१७ जून) रोजी सायंकाळी झालेल्या पाणीपुरवठ्यात अत्यंत दूषित व विषारी स्वरूपाचे पाणी नागरिकांच्या नळांना आले. पाण्यामध्ये ऑईलसारखा थर दिसून येत असून गटाराचे पाणी मिश्रित असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे विशेष म्हणजे, सोलापूर शहराला स्वच्छ व निर्मळ पाणीपुरवठा करण्याच्या घोषणा करणाऱ्या महापौरांच्या प्रभागातच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, महापौरांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून दूषित पाणीपुरवठ्याची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी. आज आशा नगरमध्ये घडलेली घटना ही केवळ एका भागापुरती मर्यादित नसून संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. भविष्यात अशा प्रकारे दूषित पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. सोलापूर शहरातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध, स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळावे, अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.
महापौरांच्या प्रभागातच दूषित पाणीपुरवठा; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू


No comments:
Post a Comment