सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील रासायनिक खत व कीटकनाशक विक्रेत्यांनी शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत सोमवार (दि. २७) पासून बेमुदत बंदची घोषणा केली आहे. शासनाकडून वारंवार मागण्या करूनही दुर्लक्ष होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा पेस्टीसाईड्स अँड फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
या संदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. व्यवसाय करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून त्याकडे शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत द्राक्ष छाटणीचा हंगाम सुरू झाला आहे. अशा वेळी खत व औषध विक्रेत्यांच्या बंदमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन संघटनेने शेतकऱ्यांना २६ एप्रिलपर्यंत आवश्यक खते, औषधे आणि बियाणे खरेदी करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
बंद काळात कोणत्याही कंपनीची खते व औषधे दुकानदारांकडून स्वीकारली जाणार नाहीत. तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक मागणी आगाऊ नोंदवून वस्तू दुकानातून घेऊन जाव्यात, यासाठी दुकानदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत दुकाने ठळक फलकही लावणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष गुंडाप्पा पंचे, सचिव बालाजी चौगुले, तसेच दौलत फलटणकर उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment