गौडगावच्या ग्रामस्थांची मनोज जरांगे-पाटील यांना भेट
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी; पीकविम्याचाही मुद्दा मांडला
गौडगाव (कटूसत्य वृत्त): प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी शेतजमिनी संपादनाच्या हालचाली वेगाने सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर गौडगाव येथील शेतकऱ्यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.
सोलापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला विरोध वाढत असून, शासन या प्रकल्पाबाबत ठाम असल्याने प्रश्न अधिकच चिघळत आहे. गौडगाव येथील शेतकऱ्यांनी दि. १ मार्च रोजी जरांगे-पाटील यांची भेट घेऊन जमिनी संपादनाबाबतच्या अडचणी व शंका मांडल्या.
याशिवाय, २०२५ च्या खरीप हंगामातील नुकसानीचा पीकविमा शेतकऱ्यांना तत्काळ मिळावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. शासनाने शेतकऱ्यांच्या भावना व हिताचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी उपस्थितांनी केली.
या भेटीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल भड, संजय नाईकवाडे, बालाजी पैकेकर, प्रमोद पाटील, सोमनाथ चव्हाण यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
शक्तिपीठ महामार्गाबाबत जिल्ह्यातील विरोधाची तीव्रता वाढत असून, पुढील काळात या आंदोलनाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment