सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वाढत्या उन्हामुळे आणि पाण्याच्या वाढत्या वापरामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात महापालिकेने मंगळवारपासून बदल केला आहे. नव्या नियोजनानुसार शहराच्या हद्दवाढ भागात पाच ते सहा दिवसांनी तर गावठाण भागांमध्ये चार दिवसांनी पाणी पुरवठा होईल.
हा बदल उन्हाळा संपेपर्यंत कायम राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना शहरातील जलस्रोतांवर मोठा ताण येऊ लागला आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने पाणी पुरवठ्याच्या दिवसांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.गावठाण भाग तसेच काही उप नगरांमध्ये सध्या तीन दिवसांनी होणारा पाणी पुरवठा आता चार दिवसांनी करण्यात येणार आहे. पाकणी आणि भवानी पेठेतील जल शुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा हा एक दिवस पुढे सरकला आहे. म्हणजेच तीन दिवसाआड होणारा पाणी पुरवठा आता चार दिवसांनी होणार आहे. त्यामुळे गावठाणातील उप नगरांना एक दिवस उशीरा पाणीपुरवठा केला जाणार आहे.
हद्दवाढ भागांमध्ये सध्या पाच दिवसांनी होणारा पाणी पुरवठा आता पाच ते सहा दिवसांच्या अंतराने केला जाणार आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात पाणी टंचाई निर्माण होऊ नये आणि उपलब्ध साठ्याचे योग्य नियोजन करता यावे, यासाठीच हा निर्णय घेण्यात आला. पाण्याचा अपव्यय टाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
- व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता-

No comments:
Post a Comment