Hot Posts

6/recent/ticker-posts

“शिवरायांचा आदर्श विसरलात का ?” सुदर्शन तारख यांचा सत्ताधाऱ्यांना जाब

 “शिवरायांचा आदर्श विसरलात का ?”  सुदर्शन तारख यांचा सत्ताधाऱ्यांना जाब




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्यात व्याख्याते शिवश्री सुदर्शन तारख (इतिहास अभ्यासक) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पनेचा परखड वेध घेत आजच्या राज्यकर्त्यांना थेट सवाल केला – “शिवरायांचा आदर्श आपण खरोखर जपतो आहोत का?” स्वराज्य, स्त्रीसुरक्षा, समानता आणि जबाबदार लोकशाही यांचा संदर्भ देत त्यांनी सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. त्यांच्या रोखठोक आणि अभ्यासपूर्ण भाषणामुळे उपस्थितांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
हा कार्यक्रम टेंभुर्णी येथील करमाळा चौक येथे, दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८.०० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रांगण, करमाळा चौक, टेंभुर्णी (ता. माढा) येथे उत्साहात पार पडला.
“छत्रपती शिवरायांचे स्वराज्य आणि आजचे राजकारण” या विषयावर बोलताना तारख यांनी सांगितले की, शिवाजी महाराज हे केवळ युद्धनीतीत पारंगत नव्हते, तर लोकाभिमुख, न्यायप्रिय आणि सर्वसमावेशक राज्यकारभार करणारे राजे होते. राजा हा प्रजेचा पालक असतो, ही भूमिका त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली. महिलांच्या सन्मानाचे रक्षण, प्रशासनातील पारदर्शकता आणि जनतेशी थेट संवाद ही शिवराज्याची वैशिष्ट्ये होती, असे त्यांनी नमूद केले.
तसेच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील समानतेच्या तत्त्वांची आठवण करून दिली. “संविधानाने प्रत्येकाला समान हक्क दिला आहे; मात्र पैशासाठी मतदान करणे ही प्रवृत्ती लोकशाहीला मारक आहे. हे संविधानकर्त्यांना अपेक्षित नव्हते,” असे ते म्हणाले.
समाजात वाढत चाललेली जातीय व धार्मिक दुरावा दूर करण्याचे आवाहन करत त्यांनी स्पष्ट केले, “हिंदू-मुस्लिम, मराठा-दलित असे विभाजन नको; आपण सर्वप्रथम भारतीय आहोत, ही भावना बळकट झाली पाहिजे. शिवरायांचे खरे स्मरण म्हणजे त्यांच्या विचारांचे आचरण.”
कार्यक्रमाच्या शेवटी “जय जिजाऊ, जय शिवराय”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात व्याख्यात्यांना प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती  संजय कोकाटे (संपर्कप्रमुख शिंदे सेना), माजी कृषी सभापती संजय पाटील (माजी सभापती जि.प.), पोपट अनपट (पं.सं. सदस्य), रावसाहेब देशमुख (तिसऱ्या गाडीची नेते), ऋषिकेश बोबडे (ग्रां.पं. सदस्य), तात्यासाहेब पाटील (माजी जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ), सुहास पाटील (अध्यक्ष रयत क्रांती), औदुंबर महाडिक (चेअरमन डी.व्ही.पी.) प्रहार चे  अमोल जगदाळे, सुरज ढवळे (युवा नेते) मयूर काळे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रास्ताविक सचिन जगताप (अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र संभाजी ब्रिगेड) यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन खुळे (जिल्हाध्यक्ष) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश मुळे, पपेश पाटील, अजय गायकवाड, विजय काळे, नागेश खरसांडे, अविनाश नांगरे, ज्योतीराम बागवाले, रामभाऊ मिटकल, दादा भोसले, अश्विन पाटील, दादा मुळे, संदेश बागल, तुकाराम भोसले, शंकर नागणे, शंकर उबाळे व नागनाथ महाडीक यांनी विशेष परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments