सर्व वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे,
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संपूर्ण देशभरात तामिळनाडू व महाराष्ट्र राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण खूप अधिक आहे. रस्ते अपघातामध्ये मानवी चुका तसेच तांत्रिक चुकांचाही समावेश आहे. तरी सर्व प्रकारच्या वाहन चालकांनी परिवहन विभागामार्फत करण्यात आलेल्या वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
नियोजन भवन येथे 37 वे जिल्हा रस्ता सुरक्षा अभियान या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दीप प्रज्वलनाने केले. यावेळी महापालिका आयुक्त सचिन ओंबसे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम , पोलीस आयुक्त एम राजकुमार , पोलीस अधीक्षक ग्रामीण अतुल कुलकर्णी, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम शामराव कुंभार, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, पोलीस उपायुक्त शहर गौहर हसन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अकलूज अमरसिंह गवारे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आसिफ मुलाणी तसेच अधिकारी कर्मचारी मोटर ड्रायव्हिंग स्कूल संघटनेचे पदाधिकारी, रिक्षा चालक-मालक संघटना पदाधिकारी व इंजीनियरिंग कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, सोलापूर शहरामध्ये कोणीही दुचाकी चालवत असताना हेल्मेट वापरत नसल्याचे दिसते. वाहन चालवताना अतिवेग व चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणे, सिग्नलचे पालन न करणे यामुळे अपघात होत असतात, सर्व वाहनचालकांनी विशेषता तरुण वर्गाने वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे तसेच आपल्या संपर्कातील घरातील इतर व्यक्तींना वाहतुकीचे नियम पाळण्यास जागृत केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रास्ताविक करताना प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी रस्ते अपघाताची कारणे व रस्ते अपघाताचे प्रमाण तसेच अपघात टाळण्यासाठी काटेकोरपणे नियमाचे पालन करणे व 18 ते 45 वयोगटात तीन व्यक्तींचा अपघातात मृत्यू पडण्याचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले तसेच सोलापूर जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले आज 13 जानेवारी हा दिवस देशभरामध्ये रस्ता सुरक्षा अभियान म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने तरुण वर्गाने दुचाकी चालवताना हेल्मेट चा वापर करणे रस्त्यावरील वाहतुकीचे नियमाचे पालन करणे वेग मर्यादा पाळणे याबाबत मार्गदर्शन केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार यांनी रस्त्यांची स्थिती रस्त्यावरील फलक वेग या तांत्रिक बाबीचे अवलोकन वाहनधारकांनी वाहन चालवताना केल्यास रस्त्याचे अपघात कमी होऊ शकतात. रस्त्याचे बांधकाम हे त्या त्या परिस्थितीनुसार केलेले असते त्यानुसार वाहन चालकाने वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे असे सांगितले.
तसेच या रस्ते अपघातात जखमी लोकांना मदत करून त्यांना जीवदान दिलेले जीवनदूत अशा व्यक्तींना जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांच्या हस्ते जीवनदीप पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी, प्रादेशिक परिवहन कर्मचारी ,तसेच समाजातील इतर व्यक्तींचा समावेश होता.
प्रारंभी जिल्हा रस्ता सुरक्षा समिती सोलापूर, प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 37 वे रस्ता सुरक्षा अभियान 2026 चे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केले.
0 Comments