निवडणुकीत अभूतपूर्व यश, महायुतीचे 75 टक्के नगराध्यक्ष
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यभरात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळालंआहे. तसेचनागपूर जिल्ह्याने ही मान अभिमानाने ताट ठेवली आहे . या अभूतपूर्व विजयाबद्दल नागपूर जिल्हा भाजप युनिटचे अभिनंदन आणि नागपूरातील मतदार बंधू-भगिनींचेही धन्यवाद. कालच्या निकालाने महाराष्ट्रात भाजपच क्रमांक एकचं पक्ष असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. महायुतीने 75 टक्के नगराध्यक्ष निवडून आणले आहे. आपण महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया केला आहे, हे स्पष्ट झालं असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. भाजपच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामगिरी या शासकीय निवासस्थानी छोटेखानी सत्कार होतोय. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
भाजपचा सर्वाधिक स्ट्राईक रेट राहिला आहे. आपण लढवलेल्या पैकी 75% नगराध्यक्ष निवडून आलेत. निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या ही दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे. सुमारे 18 नगरपालिका अशा आहेत, जिथे भाजपचे बहुमत आहे, मात्र नगराध्यक्ष निवडून येऊ शकलेले नाही. तर नागपुरात विरोधकांचे अनेक बालेकिल्ले पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. सावनेर काँग्रेसमुक्त नगरपालिका आपण तयार केली आहे, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनील केदार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केलीय. सावनेरमध्ये काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. यावर मुख्यमंत्र्यानी हा टोला लगावलाय.
मिळालेल्या विजयासाठी तुम्ही सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. तुमच्यामुळे मला अभिनंदन स्वीकारायला मिळत आहे. आमच्या वाडीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या फरकाने आपण जिंकलो आहे. नागपूर जिल्ह्यातील या सर्व 27 भागांमध्ये जोरदार विकास करण्याची जबाबदारी आपण घेऊ. आपण जिंकलेल्या 22 शहरांना मॉडल शहर म्हणून विकसित करू. विजयाची ही मालिका महापालिकेतही कायम ठेवू, महापालिका जिंकू आणि त्यानंतर जिल्हा परिषद आहे, तेही जिंकू. मात्र विजयाने आपण माजणार नाही, हे आपण लक्षात ठेवायचे आहे. असा सल्लाही मुख्यमंत्र्यानी यावेळी दिला.
महाराष्ट्रात सध्या भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत आक्रमकपणे प्रचार केला होता. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. भाजपचे 120 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. भाजपची ही राज्यातील आतापर्यंतच्या नगरपालिका निवडणुकीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. भाजपनं पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात चांगली कामगिरी केली आहे.

0 Comments