Hot Posts

6/recent/ticker-posts

राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडेच वर्ग होणार !

  राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडेच वर्ग होणार !





आमदार सुहास बाबर यांनी केली प्रयत्नांची शिकस्त !

सादिक खाटीक यांच्या हृदयस्पर्शी, जद्दोजहदला प्रचंड यश .


आटपाडी (कटूसत्य वृत्त)
            राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडेच वर्ग करण्याचा आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा दिला आहे . आमदार सुहास बाबर यांनी यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली असून राजेवाडी तलावाचा अर्थात माणदेशाचा वेडापीर सादिक खाटीक यांच्या हृदयस्पर्शी, मर्मभेदी, लक्षवेधी जद्दोजहदला प्रचंड यश आले आहे .
          खानापूर आटपाडीचे आमदार श्री . सुहासभैय्या बाबर यांनी, मुंबई मंत्रालय येथे दि . ४ नोहेंबर रोजी ११ . ३० वाजता ना . राधाकृष्ण विखे - पाटील यांची तातडीने भेट घेऊन राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याचा दि . ११ जुन रोजी सांगलीच्या आढावा बैठकीत आपण आदेश दिला होता . तथापि ४ महिने झाली . हा तुमचा आदेश अंमलात आणायचे सोडून राजेवाडी तलाव सातारा सिंचन मंडळाकडे वर्ग करण्याचा आदेश जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साताऱ्यातील जलसंपदाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांना दिल्याचे निदर्शनास आणले . या अन्यायी भुमिकेच्या विरोधात सामाजीक कार्यकर्ते सादिक खाटीक यांच्याकडून गत पंधरावड्यात वृत्तपत्रातून जोरदार आवाज उठविण्यात आला होता . याची गांभीर्याने दखल घेऊन आमदार सुहास बाबर यांनी, मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांना , राजेवाडी तलावाच्या संदर्भातील सर्वंकष वस्तुस्थितीची माहिती करून देत, राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याचा आदेश आपण दिल्याचे आणि अधिकाऱ्यांनी त्या आदेशाला दुर्लक्षीत केल्याची गंभीर बाब आमदार सुहासभैय्या बाबर यांनी, मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली .
          या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री ना . राधाकृष्ण विखे - पाटील यांनी, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणेचे कार्यकारी संचालक श्री . हणमंतराव गुणाले यांना यांना तातडीने फोन लावून, राजेवाडी तलाव सातारा सिंचन मंडळ साताऱ्याकडे वर्ग करण्याची सुरू असलेली प्रकिया थांबवण्याचा आणि राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचा आदेश कार्यकारी संचालक श्री . हणमंत गुणाले यांना मंत्री  महोदयांनी याचवेळी दिला .
          राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याचा पुन्हा आदेश दिल्याबद्दल मंत्री ना . राधाकृष्ण विखे - पाटील यांचे आणि या निर्णयासाठी लक्षवेधी भुमिका बजावले बद्दल आमदार सुहासभैय्या बाबर यांचे आटपाडीचे सामाजीक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी खास अभिनंदन केले असून राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याच्या निर्णयाचे सांगली, सोलापूर जिल्ह्यात जोरदार स्वागत होणार असल्याचेही सादिक खाटीक यांनी यावेळी स्पष्ट केले .
            सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील माण, आटपाडी आणि सांगोला तालुक्याशी १४५ वर्षापासून संबंधीत असलेल्या राजेवाडी तलावाचे मुख्य व्यवस्थापन सातारा जिल्ह्यातील राजेवाडी पासून १०० किमीवरील फलटण येथे होते व आजही आहे . पाण्याचे नियोजन, व्यवस्थापन इतर काही बाबींसाठी ते सांगोला, आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलावाच्या लाभार्थी शेतकऱ्यांना त्रासाचे होते. राजेवाडी तलावातून आटपाडी तालुक्यातील १३८७ हेक्टर क्षेत्राला आणि सांगोला तालुक्यातील २६६२ हेक्टर क्षेत्राला अशा एकूण ४०४९ हेक्टर क्षेत्राला अधिकृत पणे पाणी दिले जाते .
            याउपर १४५ वर्षातला एखादा अपवाद वगळल्यास राजेवाडी तलावाचे प्रचंड पाणी, माण तालुका अधिकृतरित्या घेतच नाही. पाणी उपसा करणारे डिझेल इंजिन अस्तित्वात आलेनंतर आणि नंतर आलेल्या पाणी उपशाच्या विद्यूत मोटारीतून जवळ जवळ साठ पासष्ट वर्षे राजेवाडी तलावाच्या बुडीत क्षेत्रा जवळच्या, बॅक वॉटर लगतच्या माण तालुक्यातल्या अनेक गावातल्या शेकडो शेतकऱ्यांनी, शेकडो विद्यूत मोटारीद्वारे अनधिकृतपणे प्रचंड पाणी उपसा केला आहे . आजही करीत आहेत . राजेवाडी तलाव निर्मितीच्या सुरुवातीच्या व्यवस्थापन नियमावलीत पाणी उपशा संदर्भातले निर्देश नसल्याने, राजेवाडी तलावाचे पाणी उपसा करणारांना अधिकृतपणे परवाने देता आले नाही . हा अधिकाऱ्यांचा, मतलबी कावा, अनधिकृत शेकडो मोटारींच्या, अनधिकृत प्रचंड पाणी उपशाकडे दुर्लक्ष करीत आला आहे . या पाणी उपसा करणारांना अधिकृत उपसा सिंचनचे पाणी परवाने दिले गेले नाहीत . आणि पाणी उपसा करणारांनीही ते परवाने मिळविले नाहीत . ना ! हा, वर्षानुवर्षांपासून, प्रत्येक वर्षी जवळ जवळ वर्षभर चालणारा प्रचंड पाणी उपसा रोखला गेला नाही . पाणी उपसा करणाऱ्यांवर कसलीही कारवाई केली गेली नाही . वर्षानुवर्षे हा अंधाधुद कारभार सुरु ठेवणारांकडूनच राजेवाडी तालुका सातारा जिल्ह्याच्या व्यवस्थापना खालीच असला पाहीजे, याचा वर्षानुवर्षे आटापीटा चालु आहे .
            राजेवाडी तलावातून एकूण ४०४९ हेक्टर क्षेत्राला पाणी दिले जात असल्याचे आणि त्यापैकी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याला १३८७ हेक्टर क्षेत्राला आणि सोलापूर जिल्ह्यातील २६६२ हेक्टर क्षेत्राला, दोन वेगवेगळ्या कॅनॉल द्वारे पाणी दिले जाते.
Reactions

Post a Comment

0 Comments