Hot Posts

6/recent/ticker-posts

शासकीय योजनांची होणार प्रभावी अंमलबजावणी- गटविकास अधिकारी संसारे

 शासकीय योजनांची होणार प्रभावी अंमलबजावणी- गटविकास अधिकारी संसारे



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रामपंचायत स्तरावर सर्व शासकीय योजना प्रभावीपणे अंमलबजावणी  करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. सदर अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबर 2025 रोजी असून, हे अभियान  पंढरपूर तालुक्यात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी सुशिल संसारे यांनी दिली.
 
या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा उद्देश गावोगावी सुशासन प्रस्थापित करणे, आत्मनिर्भरता निर्माण करणे आणि विकासाची स्पर्धात्मक भावना रुजवणे हा आहे. या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे सात घटकांवर गुणांकन केले जाणार असून त्यात सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित उपक्रम, मनरेगा व विविध योजनांची सांगड, गावपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण आणि उपजीविका विकास व सामाजिक न्यायाचा समावेश आहे. गुणांकनाच्या आधारे ग्रामपंचायतींना राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर कोट्यवधी रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
 
सर्वांग विकास करण्याची जबाबदारी गावस्तरावरील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्तरीय अधिकारी, तरुण मंडळे, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या लोकसहभागाने करणे अपेक्षित आहे.
 
या अभियानाच्या माध्यमातून "गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळून ग्रामीण संस्कृतीला नवसंजीवनी मिळेल," असा विश्वास गटविकास अधिकारी संसारे यांनी यावेळी व्यक्त केला.
Reactions

Post a Comment

0 Comments