एसआयआर कार्यक्रमाचा केंद्रीय उप निवडणूक आयुक्तांकडून आढावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 15, 2026

एसआयआर कार्यक्रमाचा केंद्रीय उप निवडणूक आयुक्तांकडून आढावा

 एसआयआर कार्यक्रमाचा केंद्रीय उप निवडणूक आयुक्तांकडून आढावा





पुणे (कटूसत्य वृत्त):- विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मतदार यादी त्रुटीमुक्त व अचूक तयार करण्यावर भर देत प्रत्येक टप्प्यावरील काम निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावे, तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या कामाचा नियमित आढावा घेऊन प्रगतीचे सातत्याने परीक्षण करावे, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त ग्यानेश भारती यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी पुणे विभागातील विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव अजोय कुमार झा, उप सचिव अभिनव अग्रवाल, राज्याचे उप मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सुर्यवंशी, विभागातील जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, विजय राठोड, मैनाक घोष, सहआयुक्त स्वाती देशमुख, संजीव पलांडे, तुषार ठोंबरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर उपस्थित होते.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम, जिल्हाधिकारी संतोष पाटील व एस. कार्तिकेयन हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होते. 

उप निवडणूक आयुक्त  भारती यांनी संबंधित अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील प्रत्येक काम सर्वोच्च प्राधान्याने आणि जबाबदारीने पार पाडावे, असे सांगितले. कामातील त्रुटी तातडीने दूर करून अपेक्षित उद्दिष्टे वेळेत गाठण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा. कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात आलेली कालमर्यादा काटेकोरपणे पाळावी. मतदार यादी त्रुटीमुक्त करण्यासाठी गणना फॉर्म भरताना प्रत्येक मतदाराची माहिती काळजीपूर्वक पडताळून अचूक नोंद करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेटी देऊन प्रत्येक मतदाराची माहिती प्रत्यक्ष पडताळावी, असे सांगितले. मतदार यादीमध्ये कोणतीही चूक किंवा त्रुटी राहणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सर्व कागदपत्रांचे काम नियमानुसार आणि परिपूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याबरोबरच आवश्यक अर्ज, नोंदी, छायाचित्रे आणि इतर संबंधित कागदपत्रांची अचूक पूर्तता करण्यावर त्यांनी भर दिला. मतदारांच्या तक्रारी आणि हरकतींचे त्वरित व प्रभावी निराकरण व्हावे यासाठी पुणे जिल्ह्यात मंडलनिहाय सुनावण्या घेण्याऐवजी संबंधित मतदान केंद्रांवरच सुनावणी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सादरीकरणाद्वारे पुणे विभागातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची माहिती दिली. पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण २ कोटी १६ लाख १ हजार १९८ मतदार असून २१ हजार २३७ मतदान केंद्रे आहेत. विभागातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून ४७ हजार ७३० मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत. गणना अर्जांच्या छपाईचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील सर्व उद्दिष्टे निश्चित कालावधीत पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीला विभागीय आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच पुणे शहरातील सर्व मतदान नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages