मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात एकरकमी थकीत कर भरल्यास ५० टक्के माफी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 2, 2025

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात एकरकमी थकीत कर भरल्यास ५० टक्के माफी

 मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात एकरकमी थकीत कर भरल्यास ५० टक्के माफी



        -पालकमंत्री गोरे



सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- गावे समृध्द करण्यासाठी आणि गावातील लोकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना गावात प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने आता 'मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान' राबविण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी गावातील लोकांनी ग्रामपंचायतीचा थकीत कर एकरकमी भरल्यास त्यांना थेट ५० टक्के सवलत देण्याची ग्वाही राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

ग्रामविकास विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राबविण्यात येणार असून, त्यासाठी रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित कार्यशाळेत ना. जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी यशदाचे उप महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, शिक्षणाधिकारी कादर शेख, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, पुणे जिल्हा परिषदेचे कृषीचे माजी सभापती शरद गुट्टे आदी उपस्थित हेाते.
     
यावेळी पालकमंत्री श्री. गोरे म्हणाले, सातत्याने कर थकविणाऱ्या आणि निवडणुका आल्यावरच कर भरणाऱ्यांवर आता शासन लक्ष ठेवून आहे. त्यामुळे सलग पाच वर्ष ग्रामपंचायतीचा कर थकविणाऱ्यावर निवडणूक लढविण्यासाठी निर्बंध घालण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तेच हे अभियान राजकारण विरहित करुन गावाला विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आणण्याचा प्रयत्न करावा. तसेच यामध्ये बक्षीस योजना ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे यंत्रणेत काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि राजकीय मंडळींनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
     या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी सर्वांनी सज्ज रहा. पहिल्या टप्प्यात या अभियानात राज्यातील जवळपास ६ हजार ५०० गावे सहभागी होतील. त्यामध्ये जवळपास १९२० गावांना बक्षीस मिळविण्याची संधी आहे. केवळ बक्षिसासाठी ही योजना नाही, तर गावे समृध्द करण्याचे अभियान असल्याचे ना. गोरे यांनी सांगितले. त्यामुळे अधिकारी कर्मचारी, आमदार, खासदार, सरपंच आणि गावगाड्यातील प्रत्येकाने यामध्ये हिरीरीने भाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

*विजेत्याचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव*

या अभियानामध्ये सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतीला कोट्यवधीची बक्षिसे मिळणार आहेत. केवळ बक्षिसासाठी नाही तर गावच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या आणि विजेत्या ३ ग्रामपंचायतीचे  सरपंचांचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान करु, असे आश्वासन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे.
ग्रामपंचायती सर्व योजनांची शंभर टक्के प्रभावी अंमलबजावणी करा. मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान यशस्वी करा असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
    माझी ग्रामपंचायत मजबूत करा. स्वच्छ असली पाहिजे. महिलांची शौचालयाची व्यवस्था पाहिजे. रंग पाहिजे. ज्या ग्रामपंचायतीस इमारत नाही एक दिवसात मंजूर करू. सर्वोत्तम अंगणवाडी असली पाहिजे. अंगणवाडी साठी लोकांना हात जोडा. नोकरदार गोळा करा. सामाजिक काम करणारे लोक गोळा करा. दानशूरांचा सन्मान करा. शाळा समृध्द असली पाहिजे. शाळेस वृक्षारोपण करा. चांगली स्मशानभुमी करा. रंगरंगोटी करा. रस्ते स्वच्छ करा. स्वच्छता मोहिम राबवा. सरपंचानो ही तुमची योजना आहे, तुम्ही प्रत्येकाने सक्रिय सहभाग घ्याच, असे भावनिक आवाहन ग्रामविकास मंत्री गोरे यांनी केले.


*प्रत्येक गावाला नोडल अधिकारी नेमू*
—————————————-
मुख्यमंत्री ग्रामसमृध्द पंचायतराज अभियानात सहभागी असलेल्या गावांमध्ये वेळेत कामे व्हावीत तसेच प्रशासकीय पातळीवर त्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी प्रत्येक गावाला एक नोडल अधिकारी नेमण्यात येईल तसेच गावातील मूलभूत कामांसाठी आणि अभियानात उत्कृष्ट काम करीत असलेल्या गावांना आमदारांच्या शिफारसीशिवाय निधी देऊ, असे आश्वासनही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे.
-------
*आषाढी यात्रेतील कामाचे समाधान*
……………………..
आषाढी यात्रा कालावधीत केलेल्या कामाचे समाधान आहे. टीम वर्क म्हणून काम केले. आषाढी यात्रेत जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद , सिईओ कुलदीप जंगम , अतिरिक्त सिईओ संदीप कोहिनकर यांनी चांगले काम केले. गटविकास अधिकारी सुशील संसारे पंढरपूर यांचा उल्लेख केला. स्वतः लहान वयात आठ तास रांगेत उभा राहून दर्शन घेतले होते. व्हीआयपी दर्शन बंद केले म्हणून चार तासात माझी वारकरी दर्शन घेऊ शकला. मी स्वतः मुखदर्शन घेतले. त्यानंतर उप मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मुख दर्शन घेतले. आधी स्वतः केले मग इतरांना सांगितले. तीन तास हातात झाडू घेतला. ४२ ठिकांनी व्यापक स्वच्छता मोहिम राबविली. असेही ना. गोरे यांनी सांगितले.
      आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचे कौतुक करून यामुळे गावे समृद्द होणेस मदत होणार असल्याचे सांगून पाच “ पी” संकल्पना समजावून सांगितली. या प्रसंगी आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या गावातील सर्व कामांत सरपंचानी मनावर घेऊन करावीत. गावाची कायापालट करणारे हे अभियान मतदार संघात प्रभावीपणे राबविणार असल्याचे सांगितले. प्रास्तविक प्रभारी सिईओ संदिप कोहिनकर यांनी केले. सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव व ऐश्वर्या हिब्बारे यांनी केले.

*यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचा आषाढी यात्रेतील उत्कृष्ठ कामा बद्दल पालकमंत्री यांचे हस्ते सन्मान करणेत आला.*

आभार उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी केले.या कार्यक्रमाला साठी प्रशासन अधिकारी झेड ए शेख, वैभव आहाळे, अमोल महिंद्रकर, गणेश हुच्चे , काटकर, यांचे सह सर्व ग्रामपंचायत टीम ने परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages