सकल मराठा समाज पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणी
कोल्हापूर : (कटूसत्य वृत्त):- कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा- कुणबी बांधवांना न्याय मिळण्यासाठी हैदराबाद गॅझेटप्रमाणे राज्य शासनाने कोल्हापूर गॅझेटियर तातडीने लागू करावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
कोल्हापूर जिल्ह्याच्या १८८१ च्या गॅझेटियरनुसार लोकसंख्या ८ लाख १८९ होती. त्यापैकी कुणबी लोकसंख्या २ लाख ९९ हजार ३५०, तर मराठा लोकसंख्या नोंदीप्रमाणे ६२ हजार २८७ होती. शेती करणारे, परंतु लढवय्ये कुणबी व शिपाईपणाचा बाणा बाळगणारे शूर मराठे व मराठी भाषा बोलणारे होते. मराठा व कुणबी यांच्यात फारसा भेद दिसत नाही. दोघांचे राहणीमान, स्वभाव, देवक, आहार, शेतीसह जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या रूढी-परंपरा यात इतके साम्य आहे की, मराठा-कुणबी या दोघांमध्ये रोटीबेटी व्यवहार (लग्न) होतात. त्यामुळे इतिहास संशोधकांच्या मते, मराठा आणि कुणबी हे एकच
आहेत, हे कोल्हापूर गॅझेटियरवरून सिद्ध होते, असे मुळीक म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्याची २०११ साली लोकसंख्या ३८ लाख होती, ती सध्या सुमारे ४२ ते ४३ लाख इतकी झाली आहे. यामध्ये जिल्हा मराठा कुणबीबहुल असल्याने मराठा, कुणबी लोकसंख्या सुमारे २० ते २१ लाख इतकी असणार आहे. परंतु २०११ पासून आतापर्यंत फक्त ६ हजार ७५० कुणबी दाखल्यांची जात पडताळणी होऊन प्रमाणपत्रे दिली आहेत. १८८२ मध्ये २ लाख ९९ हजार ३५० कुणबी लोकसंख्या होती. या हिशेबाने २०२५ पर्यंत १५ लाखांवर कुणबींची लोकसंख्या झाली असावी. परंतु, त्या प्रमाणात कुणबी दाखले मिळणे अपेक्षित असताना २०२१ पासून फक्त ६ हजार ७५० कुणबी दाखले दिले गेले आहेत, असे मुळीक म्हणाले.
कोल्हापूर संस्थानात १८८१ मध्ये १३ लाख कुणबी असताना आतापर्यंत १५ लाख कुणबींची संख्या झाली पाहिजे होती. परंतु, कुणबी दाखल्यांची अल्पसंख्या पाहता, लाखो कुणबी नोंदी कुठे गायब झाल्या आहेत, त्याचा सरकारने शोध घ्यावा, अशी मागणीदेखील समाजाने केली आहे.
चौकट
आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान कुणाचे?
१८८१ मधील गॅझेटमध्ये मराठा-कुणबी एकच आहे, असे स्पष्ट असताना १९९६ च्या गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी वेगवेगळे दाखविण्याचे षड्यंत्र कोणी केले ? १८८१ च्या मूळ गॅझेटियरमध्ये १९९६ मध्ये फेरफार करून मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान कोणी केले? १९९४ मध्ये शंभरपेक्षा जास्त जाती ओबीसीमध्ये घालत असताना, कुणबी जातीला बाहेर का ठेवले, यांचे उत्तर मिळावे, अशी मागणी करण्यात आली.
कुणबी दाखला मिळणे जिकिरीचे
न्या. संदीप शिंदे समितीच्या कुणबी शोधमोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे १ लाख ५० हजार इतक्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. परंतु, १९३२ नंतर सर्वसाधारण कुणब्यांनी मराठा नोंद केल्याने कुणबी दाखले मिळणे जिकिरीचे झाल्याचे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले..
0 Comments