Hot Posts

6/recent/ticker-posts

सुशिक्षित माणसांपेक्षा अशिक्षित माणसेच समजदार

 सुशिक्षित माणसांपेक्षा अशिक्षित माणसेच समजदार 


आपण म्हणतो की, अशिक्षित माणसांपेक्षा सुशिक्षित माणसे ही खूप जाणकार व बुद्धिवान असतात. त्यांना सगळ्या गोष्टींची योग्य जाणीव असते. सगळ्या गोष्टीत ते तरबेज व पारंगत असतात. त्यांना खरे काय आणि खोटे काय याची शहानिशा करता येते. ते कोणत्याच गोष्टीत अडकून पडत नाहीत. कोणाच्या भुलथापांना बळी पडत नाहीत. अंधश्रद्धेपासून चार हात लांब राहतात. सनातनी विचारांना मनात थारा देत नाहीत. कर्मकांड, भूतबाधा, देव अंगात येणे, करणी व भानामती या खुळचट गोष्टींवर कसलाच विश्वास ठेवत नाहीत. आई-वडिलांना खूप खूप जीव लावतात. त्यांच्या भावनांची कदर करतात. त्यांच्या आशा आकांक्षा ओळखून घेतात. आई-वडिलांना देवासमान मानून त्यांची पूजा करतात. गोरगरिबांना व गरजवंतांना सढळ हाताने मदत करतात. सामाजिक कार्यात धावून जातात. त्यांना कोणत्याच गोष्टीचा गर्व नसतो. त्यांचे मन निगर्वी व नम्र असते. त्यांच्या मनात सहानुभूती ठासून भरलेली असते. असे सुशिक्षित लोकांबद्दल प्रत्येकजण मोठ्या आदराने म्हणतो. पण आजघडीला विचार केला तर सुशिक्षित माणसांपेक्षा अशिक्षित माणसेच बुद्धिवान व समजदार आहेत असे म्हणण्याची वेळ आली आहे. अशिक्षित माणसांकडे भलेही शैक्षणिक ज्ञान कमी असेल. पण सामाजिक व व्यवहारिक ज्ञान त्यांच्याकडे भरपूर असते. त्यांनी जीवनात भलेही चार पुस्तके कमी वाचली असतील पण अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या माणसांना त्यांनी जवळून पाहिलेले असते. अनेक माणसांना जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांनी वाचलेले असते. म्हणून त्यांच्याकडे अनुभवाचे खूप मोठे भांडार असते. 
आज जर आपण सुशिक्षित माणसांबरोबर अशिक्षित माणसांची तुलना केली तर आपल्या असे लक्षात येईल की, अशिक्षित माणसांपेक्षा सुशिक्षित माणसेच अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले दिसतात. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाला नवस बोलणे व ते नवस फेडणे त्यासाठी कंदोरी करणे, उपास-तापास धरणे आणि शकुन-अपशकुन पाळणे या गोष्टी करण्यात सुशिक्षित माणसेच आघाडीवर आहेत. तसेच कुंडली पाहून लग्न करणे, कोणाची नजर लागू नये म्हणून पायाला किंवा दंडाला काळा दोरा बांधने या गोष्टी सुद्धा सुशिक्षित वर्ग कटाक्षाने पाळतो. हे कोणालाही मान्य करावेच लागेल. बुवाबाबाकडे जाऊन करणी, भूतबाधा, म्हसोबा व भानामती या गोष्टी अंगातून काढण्यासाठी अशिक्षित लोकांपेक्षा सुशिक्षित लोकांचीच गर्दी त्या बुवाबाबाकडे अधिक पाहायला मिळते. आणि बहुतांश अशिक्षित माणसे देवधर्म, भूतबाधा, करणी व भानामती या खुळचट शब्दांना मनात कसलाच थारा देत नाहीत तर अशा अंधश्रद्धेपासून अलिप्त राहून विज्ञानवादी जीवन जगतात. दुसऱ्यांना अंधश्रद्धा न पाळण्याचे धडे देतात. अशा खुळचट व अघोरी गोष्टींना ते मानत नाहीत. म्हणून मला मुद्दाम सांगावे वाटते की, सुशिक्षित माणसांपेक्षा अशिक्षित माणसेच फार बुद्धिवान व समजदार असतात. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजकाल आई-वडिलांना म्हातारपणात आधार हा सुशिक्षित मुलांचा नसून अशिक्षित मुलांचा मिळत आहे. ही वस्तुस्थिती आहे. आई वडील यांना लहानाचे मोठे करतात व खूप खूप शिक्षण शिकवून त्यांना उच्चशिक्षित करतात आणि मग नोकरीला लागल्यावर आई-वडिलांना जीव लावायचा सोडून, आई-वडिलांना सुख द्यायचे सोडून हे पोट्टे आई-वडिलांना गावी सोडून नोकरीच्या ठिकाणी स्थायिक होतात. आणि पत्नीच्या मर्जीप्रमाणे जीवन जगतात. तिकडच्याच वातावरणात मिसळतात आणि बायको लेकरांत तिकडेच रममान होतात. तिकडे आई वडील कोणत्या अवस्थेत आहेत?  आई-वडिलांची तब्येत कशी आहे? त्यांची काळजी कोण घेत आहे? त्यांना वेळेवर जेवण मिळत आहे का? हे प्रश्न त्यांना कधीच पडत नाही. तेव्हा उलट अशिक्षित मुले, शेतात काबाडकष्ट करून जीवन जगणारे आई-वडिलांची काळजी घेतात, त्यांना खूप खूप जीव लावतात, त्यांना वेळेवर जेवण देतात, त्यांना जीवापाड जपतात, त्यांना काय हवे व काय नको हे विचारतात. म्हणून मुद्दाम सांगावे वाटते की, सुशिक्षित मुलांपेक्षा अशिक्षित मुलेच आई-वडिलांची खूप सेवा करतात. आपण जर कधी वृद्धाश्रमात गेलात, तर तेथील वृद्धांना जरूर विचारा की, तुमची मुले काय करतात? तेव्हा ते आई वडील म्हणतात की, आमची मुले उच्चशिक्षित आहेत, मोठ्या पोस्टवर नोकरीला आहेत हे उत्तर त्यांच्याकडून नक्कीच ऐकायला मिळेल. पण कोणतेच वृद्ध जोडपे म्हणणार नाही की, माझा मुलगा शेतकरी आहे, माझा मुलगा व्यवसायिक आहे आणि माझा मुलगा मजुरी करतो हे वाक्य त्यांच्या तोंडातून कधीच ऐकायला मिळणार नाही. म्हणून अशा सुशिक्षित लोकांना मुद्दाम म्हणावे वाटते की, तुमच्या नोकरीला आणि तुमच्या शिक्षणाला काय चुलीत घालायचे का? ज्या आई-वडिलांनी खूप खूप खस्ता खाऊन तुम्हाला उच्च शिक्षण शिकवले, बोटाला धरून चालायला शिकवले, लहानाचे मोठे करून तुम्हाला नोकरीला लावले शेवटी त्याच आई-वडिलांना जर तुम्ही वृद्धाश्रमात पाठवत असाल तर तुमच्या एवढा नीच व निर्दयी माणूस या पृथ्वीतलावर कोणीच नाही असेच म्हणावे लागेल. 
आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुशिक्षित लोकांना आपल्या शिक्षणाचा व आपल्या नोकरीचा खूप गर्व आणि अभिमान असतो. ते अशिक्षित माणसांना कमी लेखतात, नेहमी त्यांना पाण्यात पाहतात, उपहासाने त्यांची थट्टा करतात, स्वतःला खूप शहाणे समजतात आणि आपल्या शिक्षणाचा तोरा मिरवतात. त्यांना दुसऱ्यांना मदत करणे आवडत नाही. सामाजिक कार्य करायला त्यांना नको वाटते. पण अशिक्षित माणसांना कशाचाच गर्व नसतो. ते नेहमी निगर्वी मनाने राहतात. त्यांचे मन खुल्या पुस्तकासारखे असते. आभाळाएवढे विशाल असते. ते कोणतेच काम करायला लाजत नाहीत. सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देतात. गोरगरिबांच्या कार्याला धावून जातात. त्यांच्यात माणुसकी ठासून भरलेली असते. म्हणून मला मुद्दाम सांगावे वाटते की, सुशिक्षित माणसांपेक्षा अशिक्षित माणसेच सुज्ञ, जाणकार व समजदार असतात...

- बुध्दभूषण चंद्रकांत कांबळे 
खंडाळी ता.अहमदपूर जिल्हा लातूर 
मो.7498715661
Reactions

Post a Comment

0 Comments