Hot Posts

6/recent/ticker-posts

आयुक्तांपुढे दिव्यांगांचा ठिय्या

 आयुक्तांपुढे दिव्यांगांचा ठिय्या

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून आलेल्या पत्राच्या अनुषंगाने महापालिकेतील ७८७ दिव्यांग बांधवांचा भविष्य निर्वाह भत्ता बंद केला आहे. महापालिकेच्या निर्वाह निधीतून वगळण्यात आलेल्या दिव्यांग बांधवांनी सोमवारी (दि. २३) महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर तब्बल तीन तास ठिय्या मारला. आंदोलनकर्त्यांना महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे सामोरे गेले. त्यांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर दिव्यांग बांधवांनी आयुक्तांसमोर आपली कैफियत मांडली. इतर महापालिका, शासन निर्णयाची माहिती घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिव्यांगांना दिले.


महापालिका प्रशासनाकडे नोंद असलेल्या ५० टक्के दिव्यांग व्यक्तींना दिला जाणारा ७८७ जणांचा उदरनिर्वाह भत्ता बंद केला आहे. शासनाच्या दोन योजनांचा फायदा हे लाभार्थी घेत असल्याने महापालिका प्रशासनाच्यावतीने हा निर्णय घेतला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेच्या दिव्यांग योजनेतून त्यांना वगळ्यात आले आहे. महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाकडून शहरातील दिव्यांगाची नोंद घेतली जाते. दिव्यांगांना उदरनिर्वाह भत्ता म्हणून प्रति महिना एक हजार रुपये दिले जातात. ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या खात्यावर ते जमा केले जातात. महापालिकडे अशा तीन ते चार हजार दिव्यांगाची नोंद आहे.


प्रतिवर्षी हयातीचा दाखला द्यावा लागतो. ज्यांनी हयातीचे दाखले दिले आहेत, अशा लाभार्थ्यांच्या खात्यावर निर्वाह भत्ता जमा केला जातो. महापालिकेच्या बजेटमध्ये यासाठी कोट्यवधींची तरतूद केली आहे. त्या निधीतून शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेत नियमित मासिक आर्थिक लाभ घेत असलेली व्यक्ती संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही. शासनाच्या कोणत्याही एका योजनेचा लाभ घेण्याबाबत शासन निर्णयानुसार कळविले आहे. सोलापूर महापालिकेतील दिव्यांग

उदरनिर्वाह भत्ता घेणारे लाभार्थी व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे या दोन्ही योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी महापालिकेकडील ७८७ आहेत. त्यांचा उदरनिर्वाह भत्ता बंद केला आहे. या नावाची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर व कामगार कल्याण व जनसंपर्क विभागाकडील कार्यालयात लावली आहे. अकराशे दिव्यांगांच्या खात्यावर दोन महिन्याचा निर्वाह भत्ता जमा झाला आहे. ७८७ दिव्यांगांचा निर्वाह भत्ता जमा झाला नाही.


चौकट 

शासन निर्णय असा

शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने महापालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांना ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, त्यांचा उदरनिर्वाह भत्ता बंद करावा, असे पत्र आल्याने महापालिकेतील ७८७ दिव्यांगांचा उदरनिर्वाह भत्ता न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नावे वगळण्यात आल्याचे प्रशासनाकडून दिव्यांगांना सांगण्यात आले.


Reactions

Post a Comment

0 Comments