सोलापूर जिल्ह्यात सात तालुक्यांत सहा हजार हेक्टर शेती क्षेत्राची हानी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मागील मे महिन्यात सोलापूर जिल्ह्यात प्रथमच झालेल्या वळवाच्या मोठ्या पावसामुळे सात तालुक्यांतील सुमारे सहा हजार २०२ हेक्टर क्षेत्रावर शेती पिकांची हानी झाली आहे. यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या दहा हजार ८४१ एवढी असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या अहवालात झाली आहे.जिल्ह्यात शेती क्षेत्राच्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी खात्याच्या यंत्रणेकडून पूर्ण झाले आहेत.
मात्र काही तालुक्यांची माहिती एकत्रित करण्यात आली नाही. लवकरच सर्व तालुक्यांचे नुकसानीचे अहवाल प्राप्त होतील. नुकसान झालेल्या पिकांमध्ये केळी, आंबा, द्राक्ष, पपई, ज्वारी आदींचा समावेश आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी ही माहिती दिली.
नुकसान झालेल्या शेती क्षेत्र आणि बाधित शेतकऱ्यांची तालुकानिहाय संख्या अशी: बार्शी -२४०१ हेक्टर, ५१३८ शेतकरी, माळशिरस-१८१२ हेक्टर, २१७३ शेतकरी, उत्तर सोलापूर-१०७९ हेक्टर, ६४७ शेतकरी, पंढरपूर-३२४ हेक्टर, ५७४ शेतकरी, सांगोला-८६ हेक्टर, १०३ शेतकरी आणि दक्षिण सोलापूर-१४ हेक्टर, २८ शेतकरी. जिल्ह्यात गेल्या मे महिन्यात प्रथमच तब्बल २३३ मिलीमीटर एवढा सरासरी पाऊस झाला होता. संपूर्ण पावसाळी हंगामात पडणाऱ्या एकूण सरासरीच्या सुमारे निम्मा पाऊस पडला होता. जिल्ह्यातील पावसाळी हंगामात एकूण सरासरी ४८१ मिमी इतका पाऊस पडतो.
दरम्यान, जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात एकूण ८३.८७ टीएमसी पाणीसाठा वधारला असून यात उपयुक्त पाणीसाठा २०.२२ टीएमसी आहे. त्याची टक्केवारी ३७.७३ इतकी आहे. धरणात दौंड येथून येणाऱ्या पाण्याची आवक ४०२० क्युसेक एवढी होती. गेल्या २२ मे रोजी धरणातील पाणीसाठा मृत पातळीत म्हणजे वजा ४९ टक्के इतका होता.
0 Comments