शेतकऱ्यांनी सोलारसाठी जास्तीचे पैसे देऊ नयेत
सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- सोलार बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडून खड्डे खोदून घेणे, वाहतुकीसाठी पैसे मागणे तसेच त्यांना सिमेंट, बाळू आणण्यास सांगणे आदी प्रकारच्या तक्रारी काही भागातून महावितरणकडे येत आहेत. त्या सर्व तक्रारींची महावितरण दखल घेत असून शेतकऱ्यांनीही कोटेशन व्यतिरिक्त रक्कम कोणालाही देऊ नये, असे आवाहन वीज महावितरणने केले आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणतर्फे मागेल त्याला सौर कृषीपंप योजना सुरु आहे. तर यापूर्वी केंद्र सरकारच्या कुसुम-बी योजनेतून सौरपंप आस्थापित केले आहेत. अनुसूचित जाती व जमातीमधील शेतकऱ्यांना ९५ टक्के तर इतर वर्गवारीतील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानातून सौरपंप मिळतात. त्यासाठी तीन अश्वशक्तीला (एचपी) अनुसूचित जाती व जमातीकरिता ११ हजार ४८६ रुपये, इतरांकरिता २२ हजार ९७१ रुपये, पाच अश्वशक्तीसाठी अनुक्रमे १६ हजार ३८ रुपये व ३२ हजार ७५ रुपये आणि ७.५ अश्वशक्तीला २२ हजार ४६५ रुपये व ४४ हजार ९२९ रुपये भरावे लागतात. भरलेल्या रकमेतून सोलारपंप आस्थापित करण्यापासून त्याचे कार्यान्वयन, देखभाल दुरुस्ती आदींचा समावेश केलेला आहे. त्यामुळे कोटेशनच्या रकमेव्यतिरिक्त कोणतेही आगाऊ शुल्क घेतले जात नाही.
तक्रार असल्यास मंडल कार्यालयातील नोडल अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता कय्युम मुलाणी यांच्या ९०२९१९४६८० या नंबरवर संपर्क साधता येईल.
ReplyForward |
0 Comments