स्त्री - पुरुष समानतेचे तत्व रुजवणे ही काळाची गरज आहे - कॉ. आडम मास्तर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 10, 2025

स्त्री - पुरुष समानतेचे तत्व रुजवणे ही काळाची गरज आहे - कॉ. आडम मास्तर

 स्त्री - पुरुष समानतेचे तत्व रुजवणे ही काळाची गरज आहे - कॉ. आडम मास्तर 



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संयुक्त राष्ट्रीय संघाच्या अहवालानुसार स्त्रियांसाठी सर्वात असुरक्षित ठिकाण आहे, त्यांचे घर आपल्या देशात दर रोज १४० स्त्रियांचा जीव त्यांच्या जोडीदारांकडून किंवा कुटुंबातील सदस्यांकडून हिरावून घेतला जातो. एकूण बलात्कारांपैकी ८९ टक्के बलात्कार जवळच्या, ओळखीच्या व्यक्तींकडून होतात. दर सहा तासाला एका नवविवाहित तरुणीची हत्या केली जाते. इतकेच नाही तर दर वर्षी ५ लाख मुलींना जन्माजाधी गर्भातच मारून टाकले जाते. पितृसत्ताक व्यवस्था आणि नवउदार उपभोगवादी संस्कृती यांच्या युतीमुळे महिला व मुलींसाठी कुटुंबात व समाजात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी भाजप आरएसएसच्या प्रतिगामी विचारसरणीमुळे याला खतपाणी घातले जात आहे. कामगार वर्गातील आणि अगदी सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरात देखील पुरुषांना या सामाजिक वर्चस्वाचा मोह सोडवत नाही. ते देखील घरकामात समान वाटा उचलत नाहीत आणि प्रसंगी पत्नी किंवा मुलीला 'ताब्यात ठेवण्यासाठी' हिंसाचाराचा देखील वापर करताना दिसतात. आपल्याला कामगार वर्गात विषमतेची संस्कृती झुगारून स्त्री-पुरुष समानतेची तत्वे रुजवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी या प्रसंगी व्यक्त केले. 
शनिवार दि. ८ मार्च २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून दत्त नगर लाल बावटा सिटू कार्यालय येथे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेविका शेवंता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महिलांविषयक कायद्यांचे चित्र प्रदर्शन आणि व्याख्यान पार पडले. 
या चित्र प्रदर्शनात महिलांवरील लैंगिक अत्याचार व शारीरिक हल्ले, महिलांविषयक कायदे, महिलांच्या समस्या, वाढती महागाई, बेरोजगारी, धर्मांधता, सामाजिक गुलामी, शिक्षणाचा अधिकार, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक ऐक्य आणि जातीय सलोखा याची माहिती व संदेश देणारे चित्र प्रदर्शन आकर्षित ठरले. 
या प्रसंगी व्यासपीठावर सिटूचे राज्य महासचिव एम.एच.शेख, जनवादी महिला संघटनेच्या राज्य अध्यक्षा नसीमा शेख, माकपाचे जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर), माजी नगरसेविका कामिनिताई आडम, सिटूचे सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, फातिमा बेग, लिंगव्वा सोलापूरे, ॲड कॉ.अनिल वासम, कॉ.दत्ता चव्हाण, आदींची उपस्थिती होती.  

प्रजा नाट्य मंडळ कलापथक शाहिरांनी क्रांतिगीते सादर केली.

यावेळी प्रास्ताविकात नसीमा शेख म्हणाल्या कि, अमेरिकेतील शिकागो या शहरातील कामगार महिलांनी १९०८ साली याच दिवशी वेतनवाढीच्या व कामाचे तास मर्यादित करण्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या संघर्षाची प्रेरणा होती. तेव्हापासून आजपर्यंत हा दिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार महिला दिन म्हणून दर वर्षी साजरा केला जात आहे. जगभरात आणि विशेषतः आपल्या देशात भांडवली व्यवस्थेने या दिवसाचा खरा अर्थ लपवून त्याचा वापर व्यापारी पद्धतीने करण्यास सुरवात केली असली आणि महिलांच्या व घरगुती वापराच्या विविध वस्तूंचा सेल लावणे, प्रदर्शन भरवणे यासाठी या दिवसाचा वापर केला जात असला तरी देखील आजही हा दिवस कामगार महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या संघटनांच्या दृष्टीने चळवळीचे मुद्दे व आपल्या न्याय्य मागण्यांसाठीचे लढे पुढे घेऊन जाण्याचा दिवस आहे. या वर्षी ८ मार्चच्या निमित्ताने कामगार महिलांच्या अधिकारांसाठीचे मागणीपत्रक घेऊन जाण्याचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेतला आहे. या दिवसाच्या निमित्ताने नवउदार धोरणांमुळे निर्माण झालेले व्यवस्थागत आर्थिक संकट, महिलांचे श्रम स्वस्तात वापरून आपला नफा वाढवण्याचे भांडवली व्यवस्थेचे कारस्थान, घरातील बिन मोलाच्या श्रमामुळे त्यांच्यावर येणारे दुहेरी ओझे व या सर्व परिस्थितीमुळे वाढत चाललेली प्रचंड सामाजिक विषमता, आजारी व्यक्तींची देखभाल, बाल संगोपन या क्षेत्रात होत असलेले महिलांच्या श्रमाचे अवमूल्यन व शोषण, महिलांच्या समाजातील दुय्यम स्थानामुळे, असुरक्षित जीवनामुळे त्यांच्यावर कामाच्या ठिकाणी व घरी, दारी होत असलेली हिंसा व लैंगिक छळ आणि या सर्व अन्यायाच्या विरोधात एकजूट करून लढण्याची गरज आहे. 
महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या बलात्काराची व लैंगिक अत्याचाराची मालिका सुरु आहे. मुंबई, पुणे, संभाजी नगर, नागपूर, परभणी या शहरात घडलेल्या पाशवी आणि ह्दयद्रावक घटना हे सूचित करतात कि, पुरोगामी महाराष्ट्र कुठे चालला आहे. घर, परिसर, कामाच्या ठिकाणी, प्रवास आणि कोणत्याही ठिकाणी महिलांना सुरक्षितता वाटत नाही. कारण पावलोपावली नराधमांची पिलावळ वाढत आहे. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी सरकार जलदगतीने निर्णय घ्यायला व दोषींवर कारवाई करायला विलंब होत आहे. याचा धिक्कार सिटूचे राज्य महासचिव कॉ.एम.एच.शेख यांना केला.

सदर कार्यक्रम यशस्वी आरिफ शेख, अफसाना शेख, लता तुळजापुरकर, सुनीता नरोटे, शरीफा शेख, निलोफर शेख, संगीता एडके, सुवर्णा बोद्धूल, सायरा शेख, महमदी शेख, गीता वासम, राजेश्री पद्मा,  बेबी मल्याळ, लता बल्ला, अरुणा शेट्टी, सुलोचना श्रीराम, निकिता गोणे, तबसुम शेख,  राजेश्वरी बिंगी,अनिता म्हेत्रे, उमा कारमपुरी, राधाबाई जोरीगल, रंजना जाधव, मिताली निकंबे,अर्चना निकंबे,गायत्री आमाटी, यल्लम्मा म्हेत्रे, सुशीला सातालोलु , पायल पावडशेट्टी, स्वाती कोटापल्ली, राहीसा शेख, तसेच शहीद कुर्बान हुसेन , कॉ मीनाक्षी साने व कॉ.गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक व पूर्णवेळ कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages