वाचनसंस्कृती जपायला हवी
आजच्या काळात आपण पहातो आहे की मुलांमध्ये वाचनाची आवड लुप्त होत चालली आहे. विद्यार्थ्याना वाचनाची सवय नाही. अभ्यासक्रमात विषयवार असलेली पुस्तके सुद्धा त्यांना वाचाविशी वाटत नाही. कारण सगळंच त्यानारेडिमेड मिळत आहे. बुद्धीला ताण द्यायची गरजच राहिली नाही, त्यातूनच मुलांच्या वाचनासाठी शिक्षक आणि पालकवर्ग किती जागृत आहे ही चिंतनीय बाब आहे. अध्ययनासाठी ज्ञान ग्रहणासाठी सध्याच्या परिस्थितीत व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती विसरून चालणार नाही. वाचनाने विदयार्थ्याचे व्यक्तिमत्व बहुआयामी बनते. खरं तर वाचनाची आवड मूल शाळेत दाखल होण्यापूर्वीच घरातूनच लागायला हवी. पण हल्ली पालकांची एकच - तक्रार असते कि मुल हातात मोबाईल दिल्याशिवाय किंवा टि.व्हि. लावल्याशिवाय जेवत नाहीत ? पण त्यांना ह्या सवयी लावल्या कोण ? मोबाईल त्यांच्या हातात दिला कोणी ? आपणच ना! त्याऐवजी रंगीत चित्रांची कविताची, छोट्या छोट्या कथांची, पुस्तक जेवताना चाळायला द्या ना! त्यातून हळूहळू त्यांना त्यांच्यात गोडी लागेल त्याला उत्सुकता वाटेल.
रामायण महाभारतातील कथा ऐकूनच अभिरूची विकसित होईल, संस्कार दिपिका तेनालीरामनच्या गोष्टी ,इसापनीती,बिरबलांच्या गोष्टी प्राणी-पक्षी यांची माहिती श्यामची आई, बडबड गीते, गाणी, असे एक ना अनेक साहित्य त्यांना हाताळायला द्या .बालवयात वाचनाची बीज पेरले गेले पाहिजे. त्यामुळे बालकांच्या मनावर चांगल्या संस्कारांची रुजवण होणार यात तीळमात्रही शंका नाही. मनाचे श्लोक, शुभंकरोति कल्याणम्, गायत्री मंत्र या सगळ्यांचा परिणाम आपल्या वाणीच्या उच्चारांच्या शुद्धतेसाठी होतो. या सगळ्या गोष्टीचे संस्कार प्रत्येकांनी करणे गरजेचे आहे. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांनी वाचवं अशी अपेक्षा असेल तर या या विदयार्थ्यांना विविध क्षेत्रातील पुस्तके उपलब्ध करून दिली पाहिजेत. त्यातील कोणती पुस्तके कोणत्या स्तरावरील विदयार्थ्यांनी स्तरावरील वाचायला हवीत हे शिक्षकांनी आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांना सांगायला हवे. नुसते वाचण्यासच प्रोत्साहन न देता वाचलेल्या पुस्तकांत कोणत्या लेखकाची पुस्तके आवडली ? त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळाले यावर चर्चासत्र घेतले पाहिजे. पुस्तक मला का आवडले यावर जो उत्तम विश्लेषण करेल त्याला प्रोत्साहन म्हणून एखादे दुसरे पुस्तक भेट दिले पाहिजे . यातून विद्यार्थ्यात वाचनाची आवड वाढेल, वाचनाची स्पर्धा वाढेल.\: हाच प्रयोगशील उपक्रम शिक्षकांनी राबवला पाहिजे
आपल्या विचारांना दिशा देण्यासाठी आपली मांडली उत्तम प्रकारे करण्यासाठी थोडक्यात आपली अभिव्यक्ति परिणामकारक करण्यासाठी पुस्तकं उपयुक्त ठरतात. उत्तम वाचकात एक लेखक दडलेला असतो असं म्हणतात ते अर्थातच खरं आहे. भरपूर वाचन करणारी व्यक्ति आपले मत योग्य प्रकारे मांडू शकते. या सगळ्या गोष्टीची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याचे काम शिक्षकांचे आहे. आपण घडवित असलेला आजचा विदयार्थी हा भावी नागरीक आहे. त्याअनुषंगाने वाचनसंस्कृतीचे बीज विदयार्थ्यामध्ये पेरावे, त्याला अनेक उपक्रमातून खत - पाणी मिळत गेले तर भविष्यात वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही.
सौ.अंजना भिवदास देवकर
श्री. सनातन धर्म विद्यालय
आर.सी.मार्ग . चेंबूर मुंबई -७४
मोबाईल नंबर : 9702124048
.jpg)
No comments:
Post a Comment