मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द करण्यावरून हायकोर्टच्या कार्यपद्धतीबद्दल लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. जर मोदींना चोर म्हंटल्यावर राहुल गांधींवर गुन्हा दाखल होतो तर मनोहर भिडेंवर का गुन्हा दाखल होत नाही, असा प्रश्न माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी राजू शेट्टी पंढरपूर येथे आले होते.
सोलापूर, सांगली आणि नगर जिल्ह्यातील दूध दराचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. या दूध धंद्यातील बोक्यांची इडी चौकशी झाली म्हणजे यांचा काळा पैसा बाहेर येईल, अशी मागणी शेट्टी यांनी केली. तसेच रविकांत तुपकर यांची जी काही नाराजी आहे त्या बद्दल त्यांनी ८ ऑगस्ट रोजी शिस्त पालन समिती समोर म्हणणे मांडावे. माध्यमांसमोर नाराजी व्यक्त करणे योग्य नाही. असे म्हणत तुपकर यांना खडसावले आहे.
एनडीए अथवा इंडिया मध्ये सहभागी न होता इतर पक्षांची तिसरी आघाडी तयार करून लढणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे शेट्टी यांनी एनडीए आणि इंडियापासून अंतर राखल्याचे दिसून येत आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन प्रमुख गट पाहायला मिळत आहेत. महायुतीत भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित पवार गट, प्रहार जनशक्ती पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह (आठवले गट) इतर काही लहान पक्ष आहेत.
दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट, काँग्रेससह इतर लहान पक्षांचा समावेश आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कम्युनिस्ट पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारखे काही पक्ष आहेत जे महायुती किंवा महाविकास आघाडीत सहभागी झालेले नाहीत. या पक्षांना सातत्याने तुम्ही कोणत्या आघाडीत जाणार असा प्रश्न विचारला जात आहे. याच दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडीत आम्हाला वाईट अनुभव आल्यानंतर इथून पुढे काय निर्णय घ्यायचे, कशा पद्धतीने वाटचाल करायची? यासंदर्भात आगामी काळात निर्णय घेतले जातील. कारण आम्ही प्रश्नांसाठी संघर्ष करणारे आणि निवडणुका लढवणारे छोटे पक्ष आहोत. यासाठी आम्ही आमचं स्वतंत्र व्यासपीठ तयार केलं आहे. आम्ही सगळेजण मिळून निर्णय घेऊ.
विरोधकांनी नव्याने बनवलेल्या इंडिया (INDIA) आघाडीत सहभागी होणार आहात का? त्यावर शेट्टी यांनी ‘नाही’ असं स्पष्ट उत्तर दिलं. तसेच ते म्हणाले, आमचा आधीपासूनच प्रागतिक विकास मंच आहे, जो गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. यात असणाऱ्या छोट्या पक्षांना चळवळीची पार्श्वभूमी आहे. सरकार कोणाचंही असो, आम्ही चळवळीच्या माध्यमातून जे प्रश्न मांडतो, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. आमचा हा स्वतंत्र मंच आहे. या माध्यमातून राज्य सरकारवर आणि सरकारच्या धोरणांवर अंकूश ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. महाविकास आघाडी झाली तेव्हा आमचा सुरुवातीला त्यांना पाठिंबा होता. परंतु, आमचा स्वतंत्र मंच आहे.
.png)
No comments:
Post a Comment